ठाणेकर दूषित पाणीपुरवठ्यामुळे हैराण

ठाण्यातील ज्ञानेश्वरनगर येथेदेखील पाणी गढूळ येत असल्याने महिलांनी रस्त्यावर उतरून पालिकेचा निषेध केला.
ठाण्यातील ज्ञानेश्वरनगर येथेदेखील पाणी गढूळ येत असल्याने महिलांनी रस्त्यावर उतरून पालिकेचा निषेध केला.

ठाणे : ठाण्यात पावसाचा लपंडाव सुरू असताना महापालिका क्षेत्रात गढूळ व दूषित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. घराघरातील नळाद्वारे येणारे पाणी पिवळसर असल्याने कावीळ व नानाविध आजारांची लागण झाली असून आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गेला महिनाभर हा गढूळ पाण्याचा त्रास नागरिकांना सोसावा लागत आहे.

ठाण्यातील वागळे इस्टेट, ज्ञानेश्वरनगर, अंबिकानगर, महात्मा फुले नगर, हाजूरी, पाचपाखाडी आणि घोडबंदर रोड आदी परिसरातील घरातील नळाला पिवळसर पाण्याचा पुरवठा होत आहे. काही दिवसांपूर्वी या भागात रस्ता रुंदीकरणाची मोहीम राबवण्यात आली होती. त्यावेळी गटारे बाधित झाल्याने गटारांमधील जलवाहिन्या फुटून हा त्रास उद्‌भवला असल्याची माहिती स्थानिक रहिवाशी दत्तात्रय जाधव यांनी दिली. त्यामुळे साथीचे आजार बळावण्याचा धोका वाढला आहे. 

ठाणे महापालिका क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या भूमिगत असल्याने कदाचित जलवाहिनी बाधित होऊन गढूळ पाणीपुरवठा होत असावा, अशी शक्‍यता नागरिकांकडून वर्तवली जात आहे. याबाबत स्थानिक शिवसेना नगरसेवक संतोष वडवले यांनी पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले.

कोपरीत पाण्याला मलमूत्राची दुर्गंधी
ठाणे पूर्वेकडील कोपरी साईनाथनगर भागात सुमारे ४५० घरे आहेत. येथील जोहराबाई चाळीमध्ये नळातून येणारे पाणी गढूळ असून त्या पाण्याला मलमूत्राची दुर्गंधी येत असल्याच्या तक्रारी स्थानिक नागरिकांनी केल्या आहेत. हे दूषित पाणी बाटलीत भरून ठाणे पालिकेच्या कोपरी प्रभाग समिती कार्यालयातील पाणीपुरवठा विभागालाही दाखवल्याचे स्थानिक रहिवाशांनी सांगितले. याबाबत कोपरी प्रभाग समितीचे जल अभियंता प्रशांत भोवड यांना विचारले असता, या परिसरातील गटारे तुंबल्याने लाकडी खुंटी मारलेल्या जलवाहिनीतून हा त्रास उद्‌भवत असावा, असे स्पष्ट करीत संबंधित विभागाला कळवल्याचे सांगितले.

गेल्या अनेक दिवसांपासून नळाला गढूळ पाणी येत आहे. त्यामुळे अंगाला खाज सुटून उलट्या, जुलाब, ताप यासारख्या आजारांसह काविळीच्या आजाराने अनेकांना पछाडले आहे. स्थानिक नगरसेवकाकडे याबाबत तक्रार केली असता त्यांनी आपण काहीच करू शकत नसल्याचे सांगितले. 
- उषा भोसले, रंजना मेणकुटे, स्थानिक महिला 

ठाणे शहराच्या काही भागात असे गढूळ पाणी येत आहे. मुंबई पालिकेच्या पाणीपुरवठा योजनेतून होत असलेल्या रॉ वॉटर पुरवठ्यामुळे सध्या ही परिस्थिती उद्‌भवली आहे. येत्या काही दिवसात नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा करण्यात येईल. 
- अर्जुन अहिरे, उपनगर अभियंता, महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com