वाढलेल्या डिझेलच्या भावाचा परिणाम भाज्यांच्या दरावर

काही दिवसांपूर्वी २० रुपये किलोला विकला जाणारा टोमॅटो आता ४५ रुपयांवर पोहोचला आहे.
Mumbai
MumbaiSakal

मुंबई : श्रावण महिना सुरू झाला की भाज्यांची मागणी आपसूकच वाढते. मुंबईत कांदा-बटाटा वगळता बहुतांश सर्व भाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत. लहरी पावसामुळे घटलेले उत्पादन, इंधन दरवाढ आणि आता पितृपक्ष पंधरवड्यामुळे मागणीत झालेली वाढ यामुळे भाज्यांचे दर कडाडले आहेत. काही दिवसांपूर्वी २० रुपये किलोला विकला जाणारा टोमॅटो आता ४५ रुपयांवर पोहोचला आहे.

वाढलेल्या डिझेलच्या भावाचाही परिणाम भाज्यांच्या दरावरही झाला आहे. तर, ४० रुपयांना विकली जाणारी गवार १०० रुपये किलो अशी विकली जात आहे. प्रत्येक भाज्यांमागे २० ते ३० रुपये प्रतिकिलो भाव वाढला आहे. वाशी येथील ‘एपीएमसी’च्या भाजीपाला बाजारात मंगळवारी आवक कमी झाली आहे. बाजारात रोजच्या सुमारे ६०० गाड्यांऐवजी ४८४ गाड्या भाज्यांची आवक झाली असून, आधी प्रतिकिलो १० ते २० रुपयांनी मिळत असलेल्या भाज्यांचा दर आता २० ते ३० रुपये प्रतिकिलो झाला आहे. घाऊक बाजारात वाढ झाल्याने या सर्व भाज्या किरकोळ बाजारात दुप्पट ते तिप्पट दराने विकल्या जात आहेत. इंधन दरवाढीमुळे वाहतूक खचार्त वाढ झाल्याने ही दरवाढ करण्याशिवाय पर्याय नसल्याचे भाजी विक्रेते म्हणत आहेत.

वाहतुकीचा खर्च वाढला -

भाज्यांचे भाव डिझेलचे दर वाढल्यामुळे वाहतुकीचा खर्च वाढला आहे. त्यामुळे महागल्या आहेत.

९४ रुपयांपर्यत डिझेल गेले आहे. त्यामुळे, वाहतुकीचा खर्च जास्त आहे

तसेच महाराष्ट्रात पाऊस ही कमी जास्त प्रमाणात आहे. त्यामुळे उत्पादन ही कमी आहे. तसेच पितृपक्ष असल्यामुळे भाज्यांना मागणी जास्त आहे.

रामदास पवळे, व्यापारी, भाजी मार्केट, एपीएमसी वाशी

भाजीपाला महागल्यामुळे गृहिणींच्या बजेटवरही मोठा परिणाम झाला आहे. कांदा-बटाटा आणि कोबी वगळता बहुतांश सर्व भाज्यांचे दर तेजीत आहेत. घाऊक बाजारांत कवडीमोल दर मिळाल्याने शेतकऱ्यांनी काही भाज्या फेकून दिल्यात. पुरेशी लागवड न झाल्याने गेल्या काही दिवसांपासून भाज्यांची आवक कमी होत आहे.

मुंबईत ठिकठिकाणचे भाज्यांचे दर वेगवेगळे आहे. सांताक्रूझ, दादर, परऴ, लालबाग, साकिनाका, दक्षिण मुंबईत भाजीपाल्याचे दर थोडे महाग आहेत. तर कुर्ला, गोवंडी, गोरेगाव या भागात भाजीपाल्याचे दर तुलनेने कमी असल्याचे चित्र आहे.

१० ते १५ रुपयांनी दर वाढले -

गेल्या आठवड्याभरापासून काही मोजक्याच भाज्यांचे दर १० ते १५ रुपयांनी वाढले आहेत. भेंडी, फरसबी, गवार, वाटाणा आणि शिमला मिरची या चार -पाच भाज्यांचे दर वाढले आहेत. सध्या यांचा दर २० ते ३० रुपये किलो आहे. गाड्यांची आवक ४५० पर्यंत झाली आहे. तर, रिटेलमध्ये याचा फटका जास्त बसतो. कारण, घाऊक बाजारातून गेलेला माल बऱ्याचदा खराब किंवा वाया जातो. त्यामुळे, १० ते १५ टक्के वाढीव दराने भाज्या विकल्या जातात. आधी भाव ५ ते १० रुपये होता तो आता १० ते २० रुपये झाला आहे.

शंकर पिंगळे, संचालक, भाजीपाला मार्केट, एपीएमसी वाशी

घाऊक बाजारातील किंमत- किलो मागे

भेंडी - ३५ रुपये

भोपळा - १९ रुपये

शिमला मिरची- ३४ रुपये

दुधी- २४ रुपये

मिरची- ३० रुपये

कोबी - १२ रुपये

वांगी- १८ रुपये

गवार - ४५ रुपये

टोमॅटो - १३ रुपये

चवळी शेंग - रुपये

पडवळ - ४० रुपये

फ्लाॅवर - २२ रुपये

फरसबी - ४० रुपये

वाटाणा - ११० रुपये

किरकोळ बाजारातील किलोचे दर -

भेंडी - ६० रुपये

भोपळा - ६० रुपये

शिमला मिरची- ३४ रुपये

दुधी- ४० रुपये

मिरची- ३० रुपये

कोबी - ६० रुपये

वांगी- ६० रुपये

गवार - ८० रुपये

टोमॅटो - २० रुपये

चवळी शेंग - ६० रुपये

पडवळ - ६० रुपये

फ्लाॅवर - ७० रुपये

फरसबी - ६० रुपये

वाटाणा - १०० रुपये

श्रावणात भाज्या महागतात. शिवाय, मांसाहार बंद असतो. त्यामुळे, भाज्यांचे सेवन जास्त केले जाते. मात्र, हल्ली भाज्या फार महागल्या आहेत. पाव किलो भाजी आधी ७ ते १० रुपये किलो होती पण आता १५ ते २५ रुपये पाव किलो भाजी खरेदी करावी लागत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com