मुंबई - परिवहन विभागाने मार्चपासून "स्टिंग ऑपरेशन' करून 5534 मुजोर रिक्षाचालकांवर कारवाई केली आहे. त्यापैकी 3351 रिक्षाचालकांकडे बिल्ला आणि परवाना नसल्याचे उघड झाले. या कारवाईत भाडे नाकारणाऱ्या 725 रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात आली. त्याचप्रमाणे 175 रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत.
परिवहन विभागाने महामुंबई क्षेत्रातील रिक्षाचालकांची अरेरावी थांबवण्यासाठी 1 मार्चपासून विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत आतापर्यंत 5534 रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यापैकी 60 टक्के म्हणजे 3351 रिक्षाचालकांकडे आवश्यक पात्रता नसल्याचे उघड झाले. त्यामुळे त्यांच्या रिक्षावरील मीटर काढण्यात आले. भाडे नाकारणे, जादा प्रवासी घेणे, जास्त भाडे आकारणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात आली. पालघर जिल्हा वगळता महामुंबई क्षेत्रात झालेल्या या कारवाईत एवढ्या मोठ्या प्रमाणात बोगस रिक्षाचालक आढळल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
परवाना आणि बिल्ला नसलेल्या रिक्षाचालकांची सुनावणी परिवहन अधिकाऱ्यांकडे होईल. त्यानंतर त्यांच्यावरील कारवाई निश्चित केली जाईल असे सांगण्यात आले. या कारवाईसाठी 14 भरारी पथके नेमण्यात आली आहेत. या पथकांत 28 मोटर वाहन निरीक्षक आणि साध्या वेशातील 14 कार्यालयीन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. साध्या वेशातील कर्मचारी प्रवासी बनून रिक्षाचालकाकडे जातात. या वेळी गुप्तपणे व्हिडीओ रेकॉर्डिंग केले जाते. रिक्षाचालकाने भाडे नाकारल्यास कारवाई केली जाते.
महिनाभरात...
रिक्षाचालकांवर कारवाई : 5534
भाडे नाकारणे : 725
जादा भाडे : 41
जादा प्रवासी : 374
बिल्ला, परवाना नाही : 3351
परवाना जप्त : 2722
रिक्षा जप्त : 175
नागरिकांचा प्रवास सुरक्षित व्हावा म्हणून परिवहन विभागातर्फे कारवाई केली जात आहे. अधिकृत चालकांनीच रिक्षा चालवावी, भाडे नाकारू नये यासाठी ही मोहीम सुरू आहे. अनधिकृत रिक्षाचालकांवरील कारवाई सुरूच राहील.
- शेखर चन्ने, परिवहन आयुक्त
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.