भाईंदरमध्ये मेट्रोचा नवा वाढीव मार्ग, कारशेड वादात

भाईंदरमध्ये मेट्रोचा नवा वाढीव मार्ग, कारशेड वादात

मेट्रोचा नवा वाढीव मार्ग, कारशेड वादात भाईंदरमधील ग्रामस्थांचा विरोध; विश्‍वासात न घेतल्याचा आरोप भाईंदर, ता. ११ (बातमीदार) : दहिसर ते भाईंदर या मेट्रो मार्गाच्या कामाने एकीकडे वेग घेतलेला असतानाच दुसरीकडे या मार्गाचा राई गावापर्यंतचा वाढीव मार्ग तसेच कारशेडची जागा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. मेट्रोच्या नव्या वाढीव मार्गाला तसेच कारशेडसाठी निश्चित करण्यात आलेल्या जागेला स्थानिकांनी विरोध करण्यास सुरुवात केली आहे. दहिसर चेकनाक्यापासून भाईंदर पश्चिमेपर्यंत येणाऱ्या मेट्रो मार्गाचे काम सध्या वेगाने सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच या मार्गाची पहाणी सुरू असताना भाईंदर पश्चिमेपर्यंत येणारी मेट्रो पुढे राई गावापर्यंत वाढवण्याचा तसेच राई गावाच्या मागील बाजूस त्यासाठी कारशेड उभारण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता; मात्र या वाढीव मार्गाला तसेच कारशेडला भूमिपुत्र सामाजिक समन्वय संस्थेच्या माध्यमातून स्थानिकांनी विरोध केला आहे. काही दिवसांपूर्वीच भाईंदर पश्चिमेतील सुभाषचंद्र बोस मैदान ते मोर्वा गाव या रस्त्याच्या रुंदीकरणाला स्थानिकांनी विरोध केल्यामुळे हे काम रद्द झाले आहे. आता याच मार्गावरून मेट्रोचा मार्ग नेण्यात येणार आहे. त्यामुळे मेट्रोच्या माध्यमातून रस्ता रुंदीकरणाचा कार्यक्रम पुन्हा राबवण्यात येणार असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. ज्या ठिकाणी मेट्रोची कारशेड उभारली जाणार आहे, त्या जागा खासगी मालकीच्या आहेत. या जगांच्या बदल्यात भूमिपुत्रांना किती मोबदला दिला जाणार याची कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. शिवाय कारशेडमुळे नागरिकांच्या शेती व्यवसायावरही परिणाम होणार आहे. कोणताही प्रकल्प राबवताना त्या प्रकल्पाचे आसपासच्या नागरिकांवर आर्थिक, सामाजिक परिणाम काय होणार आहेत, त्यामुळे किती प्रदूषण होणार, याचे संपूर्ण सर्वेक्षण करून त्याचा अहवाल तयार करणे आवश्यक होते; मात्र असे काहीही न करता कारशेडसंदर्भात स्थानिकांना विश्वासात न घेताच प्रारूप अधिसूचना काढण्यात आल्याचा आरोप भूमिपुत्र सामाजिक समन्वय संस्थेचे अध्यक्ष अशोक पाटील यांनी केला आहे. --- स्थानिकांच्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर मिरा-भाईंदर महापालिकेने, एमएमआरडीएचे अधिकारी, लोकप्रतिनिधी, स्थानिकांचे शिष्टमंडळ यांची संयुक्त बैठक गेल्या आठवड्यात बोलावली होती, परंतु त्यातून फारसे काही निष्पन्न झालेले नाही. स्थानिकांचा विरोध कायम असून लवकरच मुर्धा, राई आणि मोर्वा गावातील रहिवाशांची बैठक बोलावून यासंदर्भात पुढील दिशा ठरवणार आहोत. - अशोक पाटील, अध्यक्ष, भूमिपुत्र सामाजिक समन्वय संस्था

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com