कासा, ता. ३ (बातमीदार) ः गेल्या चार वर्षांपासून तवा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे काम अपूर्ण आहे. एक कोटीपेक्षा जास्त निधी खर्च झाला असून या आरोग्य केंद्राचे काम पूर्ण नसल्याने तवा आरोग्य केंद्राच्या परिसरातील तवा, कोल्हान, धामटने, पिंपळशेत बु. येथील हजारो रुग्णांची गैरसोय होत आहे. त्यामुळे रुग्णालयाचे काम लवकर पूर्ण करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
तवा प्राथमिक आरोग्य केंद्र हे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगत असल्याने महामार्गावर अपघात झाल्यास जखमींना उपचार करण्यासाठी या प्राथमिक आरोग्य केंद्राची मदत होते. तवा परिसरातील पेठ, धामटने, कोल्हान, पिंपळशेत बु., वांगर्जे गावामधील सतरा ते अठरा पाड्यांतील ज्येष्ठ नागरिक, गरोदर माता, लहान मुले यांना उपचारासाठी तवा येथील आरोग्य केंद्राचाच आधार आहे. त्यामुळे सद्यःस्थितीत असणारी आरोग्य केंद्राची इमारत अपुरी पडत होती. त्याचा विचार करून सरकारने नवीन इमारतीच्या बांधकामासाठी चार वर्षांपूर्वी एक कोटी पंचवीस लाखाच्या आसपासचा निधी मंजूर केला होता. त्यानुसार नवीन इमारतीचे बांधकाम चार वर्षांपासून सुरू असले तरी अजूनही अपूर्णच आहे.
नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सहा खाटा, महामार्गावर अपघातामध्ये जखमी व्यक्ती, गरोदर माता यांच्यावर उपचार करण्यासाठी अत्याधुनिक प्राथमिक उपचार सुविधा, प्रसूती साठी सुसज्ज प्रसूतिगृह अनेक अत्याधुनिक सुविधा या नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रात असणार आहेत. मात्र या रुग्णालय इमारतीचे वीट बांधकाम, सुरक्षा भिंत, प्लास्टर, लादी आदी कामे पूर्ण झाली आहे. मात्र, वीजजोडणी आणि पाणी फिटिंगची कामेही अपूर्ण आहेत. त्यामुळे नवीन इमारतीमध्ये अजूनही प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू झाले नसल्याने नागरिकांची मोठी पंचाईत होत आहे.
समाजमंदिरात रुग्णालय
सध्या तवा येथील समाजमंदिरात प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू आहे. येथील जागा अरुंद असल्याने तेथील डॉक्टर व कर्मचाऱ्यांनादेखील मोठी कसरत करावी लागत आहेत. त्यामुळे लवकरात लवकर नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करावे, अशी ग्रामस्थ मागणी करीत आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून लहानशा जागेत प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू आहे. अनेक दुर्गम भागातून नागरिक उपचारासाठी येथे येत असतात. त्यासाठी नवीन प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकाम सुरू केले; पण वीज व पाणी यांची सोय झाली नसल्याने अजून ते सुरू झाले नाही; तरी ते लवकरात लवकर सुरू करावे, अशी मागणी केली आहे.
- योगेश नम, सचिव, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी
या आरोग्य केंद्राचे काम पूर्ण झाले असून फक्त पाणी व विजेचे काम बाकी आहे. पाण्याच्या सुविधेसाठी ३० लाख रुपयांचे साहित्य आहे; पण सध्या तात्पुरती उपाययोजना करून बाजूस असलेल्या शाळेच्या विहिरीतून पाणीपुरवठा करून दोन ते तीन महिन्यांत हे प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करू.
- डॉ. दयानंद सूर्यवंशी, जिल्हा शल्य चिकित्सक, पालघर