Satej patil At sakal YIN event
Satej patil At sakal YIN eventsakal media

‘यिन’च्या माध्यमातून प्रबळ विचारांची देवाणघेवाण- राज्यमंत्री सतेज पाटील

मुंबई : आपण जर एखादे स्वप्न (dream) बघत असू तर ते पूर्ण करण्यासाठी कष्ट घेण्याची तयारी हवी. तशी मानसिकता आणि विचार तयार झाले पाहिजेत. ‘यिन’च्या (Young inspiration network) माध्यमातून प्रबळ विचारांची देवाणघेवाण होते, असे प्रतिपादन गृह आणि परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांनी आज ‘यिन’ मंत्रिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान केले. येत्या काळात तुमचे-आमचे भवितव्य सोशल मीडिया (social media) ठरवणार आहे; पण त्याचाही जपून वापर करणे गरजेचे आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

Satej Patil and Shriram Pawar
Satej Patil and Shriram Pawarsakal media

इच्छा-आकांक्षा असणाऱ्या नव्या विचारांच्या पिढीला भेटून संवाद साधणे यात निश्चितच नवी उमेद, नव्या संकल्पना पुढे याव्यात, अशी प्रत्येकाचीच अपेक्षा असते. इच्छाशक्तीच्या विचारातून माणूस पुढे जातो. वर्तमानपत्र आणि जाहिरातींपलीकडे जाऊन ‘सकाळ’ने समाजातील प्रत्येकाला दिशा दाखवण्याचा प्रयत्न ‘यिन’च्या माध्यमातून संपूर्ण देशात केला आहे. महाविद्यालयाच्या पलीकडे जाऊन प्रत्यक्षात जेव्हा काम करण्याची वेळ येते तेव्हा त्यातील अडचणी आणि समस्या वेगळ्या असतात. स्वप्न बघण्याची संधी ‘सकाळ’च्या माध्यमातून उपलब्ध झाली, असे मत सतेज पाटील यांनी व्यक्त केले.  

Satej patil At sakal YIN event
मुंबईतील ३०७ शाळा तंबाखूमुक्त; उपक्रम राबवताना मात्र सरकारी धोरणांचा अडसर

आज आपण देशात लोकशाहीच्या माध्यमातून सर्व व्यवस्था पार पाडत आहोत. ६०-७० वर्षांपूर्वी महात्मा गांधी यांनी अहिंसेच्या माध्यमातून हा देश स्वतंत्र करण्याची भूमिका घेतली. त्या वेळेस स्वातंत्र्य मिळेल की नाही, यात शंका-कुशंका होत्या; पण विचार पक्का असेल तर कृतीची धारही आली पाहिजे. वक्तृत्व असून चालत नाही, तर कृतीही करावी लागते, हे सात वर्षांपासून आम्ही अनुभवत आहोत. अनेकदा व्यवस्थेला आपण नावे ठेवतो. त्यातून आपणही नकारात्मक व्हायचे का, हादेखील विचार झाला पाहिजे. जुने ते चांगले नव्हते, असे म्हणता येणार नाही; पण नव्याची संकल्पना मांडून पुढे गेले पाहिजे, असे पाटील यांनी सांगितले.

आता सोशल मीडियाच्या माध्यमातून द्विधा मनस्थिती निर्माण झाली आहे. सत्य आणि असत्यतेचा मार्ग कुठे थांबतो आणि कुठे सुरू होतो हे आपल्याला कळत नाही. ३० वर्षांपूर्वीची परिस्थिती आणि प्रलोभने वेगळी होती; परंतु सुदैवाने इंटरनेटचा वाढलेला वापर आणि दुर्दैवाने एका क्लिकवर १० लाख प्रलोभने आजच्या पिढीसाठी उपलब्ध आहेत. त्यामुळे आता विचार आणि शिक्षणाने सक्षम होणे ही गरज आहे. वैचारिक प्रगल्भता बदलली पाहिजे. कुठलीही गोष्ट अशक्य नाही, फक्त कष्ट करण्याची मानसिकता हवी. इतिहास पाहिला तर जगात जी माणसे मोठी झालीत त्या प्रत्येकाने कष्ट केले आहेत. परिस्थितीला दोष न देता ती स्वीकारून पुढे गेले पाहिजे. शिक्षण, समाज, राजकारण किंवा कोणत्याही वेगवेगळ्या क्षेत्रात असेल असे एक तरी काम केले पाहिजे, ज्यातून लोकांनी आपल्याला आठवणीत ठेवले पाहिजे, असे पाटील यांनी नमूद केले.

मी राजकारणात १९९२ मध्ये सक्रिय झालो. शिवाजी विद्यापीठाच्या स्टुडंट कौन्सिलच्या अध्यक्षपदी माझी निवडणूक झाली होती. त्यानंतर निवडणुका बंद झाल्या. निवडणुका झाल्या असत्या तर नवीन नेतृत्व तयार झाले असते. त्यावेळेस चार जिल्ह्यांचा मतदारसंघ होता. कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर हे चार जिल्हे होते. त्यावेळेस तिथल्या युवकांना भेटणे, त्यांच्याशी संवाद साधणे, त्यातून निवडून येणे हे फार कष्टाचे काम होते. वर्षभर प्रचंड काम करून विद्यार्थ्यांसाठी भूमिका मांडली, असे पाटील म्हणाले.

आमदार व्हायचे ठरवले आणि झालोही!
१९९९ मध्ये मी आमदारकीसाठी उभा राहण्याचा प्रयत्न केला. उमेदवारीसाठी दिल्लीत एक महिनाभर होतो; पण नाही मिळाली. ‘इंडिया गेट’वर बसून होतो. माझे मित्र मला पुन्हा कोल्हापूरला बोलवत होते. बंडखोरी करून अर्ज भरू, असे सांगत होते; पण माझा विचार पक्का होता. आमदार व्हायचे, राजकारणात यायचे, समाजकारण करायचे हा विचार मनाशी ठरला होता. त्यानंतर कोल्हापूरला अर्ज भरण्याची वेळ निघून गेली होती. पाच वाजताचे कोल्हापूरला परतण्याचे विमान पकडले आणि रात्री उशिरा परतलो; पण इंडिया गेटवर ठरवूनच निघालो होतो की, २००४ मधील निवडणुकीला उभे राहायचे. पाच वर्षांत खूप काम केले. कोणाकडेही उमेदवारी मागितली नाही आणि २००४ मध्ये अपक्ष आमदार म्हणून निवडून आलो, अशा शब्दांत आपला जीवनप्रवास उलगडून दाखवत सतेज पाटील यांनी युवकांना दिशा देण्याचे काम केले.

पुढची ५० वर्षे तुमची!
येत्या काळात तुमचे-आमचे भवितव्य सोशल मीडिया ठरवणार आहे; पण त्याचाही जपून वापर करणे गरजेचे आहे. भविष्यातील पुढची ५० वर्षे ही तुमची आहेत. ती चांगली ठेवायची असेल तर बंधू-भावाची भूमिका ठेवावी लागणार, असे ठाम मत सतेज पाटील यांनी मांडले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com