
ई-सेवा केंद्रांनी पायपीट थांबवली
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. ३ : गावागावांमध्ये ई-सेवा केंद्र झाल्याने प्रत्यक्ष तहसील कार्यालयात न येता नागरिकांना आपल्याच गावात दाखले मिळत आहेत. दाखल्यांसाठी सरकारी कार्यालयांमध्ये खेपा मारणाऱ्यांची पायपीट थांबत आहे. कोरोना कालावधीत वाहतूक आणि कार्यालयांमध्ये बंदी असताना ई-सेवा केंद्राद्वारे रायगड जिल्ह्यात सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. तब्बल १७ लाख २३ हजार दाखले वाटप झाले आहेत. नागरिकांचा ई-सेवा केंद्रांना मिळणारा प्रतिसाद पाहून मंजुरी मिळालेले; मात्र ग्राहकांच्या अल्प प्रतिसादाने अद्याप बंद असलेले ग्रामीण भागातील ई-सेवा केंद्र सुरू होत आहेत.
सध्या रायगड जिल्ह्यात ग्रामीण भागामध्ये ८८४ पैकी ३५० केंद्र कार्यरत आहेत. तर शहरी भागात १०५ मंजूरपैकी ९७ केंद्रे कार्यरत आहेत. सरकारच्या ३७० सेवा या ई-सेवा केंद्राद्वारे नागरिकांसाठी कार्यरत आहेत. या सर्व सेवा केंद्रामधून मिळतात. पूर्वी या सेवा ठराविक ठिकाणीच मिळत असल्याने नागरिकांची गैरसोय होत होती. जानेवारी ते डिसेंबर २०२१ या कालावधीत जिल्ह्यातील ४४७ केंद्रांत १८ लाख १६ हजार ३१५ दाखले आले होते. त्यापैकी १७ लाख २३ हजार ३४२ वाटप करण्यात आल्याची माहिती जिल्ह्या प्रशासनाकडून देण्यात आली. उर्वरित ९२ हजार ९७३ दाखल्यांच्या त्रुटी काढून त्यांचेही वाटप करण्यात येत आहे. विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांना तहसील कार्यालयात विविध दाखल्यांसाठी खेपा माराव्या लागू नये, यासाठी लोकसंख्येनुसार जास्तीत जास्त ई-सेवा केंद्रांना मंजुरी दिली जात आहे.
साधारण वर्षभरात दोन ते तीन वेळा आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज मागवले जातात. अर्ज आल्यानंतर ६० दिवसांनी समितीमार्फत मंजूर होऊन त्याला सेवा केंद्र सुरू करण्यास परवानगी दिली जाते. सेवा केंद्र मंजूर झाल्यानंतर सहा महिन्यांच्या कालावधीत किमान ३० नागरिकांना दाखले वाटप होणे आवश्यक आहे. तसे न झाल्यास त्यांचा परवाना रद्द होऊ शकतो. ई-सेवा केंद्राचे महत्त्व आता नागरिकांना समजू लागल्याने दाखले वाटपाचे कामही वाढले आहे. परिणामी, बंद ई-सेवा केंद्र नव्याने सुरू होत असून जिल्ह्यातील नागरिकांची दाखल्यांसाठीची पायपीट थांबत आहे.
***
ई-सेवा केंद्रांची वाढती मागणी
ई-सेवा केंद्रांना जिल्हा स्तरावर सेवा केंद्राच्या परवानगी देण्यात येतात. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आलेली आहे. २०२१ मध्ये सेवा केंद्रासाठी जिल्ह्यातून १४६ अर्ज दाखल होते. त्यापैकी ९२ अर्ज मंजूर झाले, तर ५४ अर्ज नामंजूर झाले. नामंजूर अर्ज विविध कारणांमुळे बाद झाले आहेत.
***
आपले सरकार सेवा केंद्र हे नागरिकांसाठी सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निर्माण झाले आहे. नागरिकांना कार्यालयामध्ये फेऱ्या माराव्या लागू नयेत, हा महत्त्वाचा उद्देश आहे. त्यामधून निश्चित महसूल येतो. मात्र, सरकारचा तो मूळ उद्देश नसून अधिकाधिक सेवा पोहचवण्याचा आहे. याला रायगड जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे.
- अमित सानप, उपजिल्ह्याधिकारी, सामान्य प्रशासन
Web Title: Todays Latest Marathi News Ali22b35471 Txt Raigad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..