
पुराचा प्रश्न न सोडवल्यास रेल रोको
कर्जत, ता. ५ (बातमीदार) : ''कर्जत-पनवेल रेल्वे मार्ग टाकल्यापासून या परिसरातील शंभरच्या वर कुटुंबांना दर पावसाळ्यात जीव मुठीत धरून राहावे लागत आहे. पावसाळ्यात तीन-चार वेळा पाणी येत असल्याने या परिसरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळित होते. ही समस्या दूर करण्यासाठी संबंधित विभागांशी पत्रव्यवहार केला होता. पावसाळा दीड महिन्यावर आला तरी ठोस उपाययोजना केली नाही. या परिसरात उद्भवणाऱ्या पुराच्या पाण्याचा प्रश्न मध्य रेल्वे प्रशासनाने सोडवला नाही, तर कर्जत स्थानकावर रेलरोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आमदार महेंद्र थोरवे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
कर्जत तालुक्यातील किरवली ग्रामपंचायतीमध्ये असलेल्या ज्ञानदीप वसाहतीमध्ये कर्जत-पनवेल रेल्वे मार्गामुळे नेहमीच पुराचे पाणी येते. गेल्या १५-१६ वर्षांपासून या पुराच्या पाण्याचा बंदोबस्त करावा, यासाठी रहिवासी मध्य रेल्वे प्रशासनाशी पत्रव्यवहार करत होते; मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. अखेर हा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते पंकज मांगीलाल ओसवाल यांनी हाती घेत रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू केला. रेल्वेचे अधिकारी अनिल हिवाळे यांनी रहिवाशांच्या समस्या समजावून घेतल्या होता. त्यानंतर डॉ. अपर्णा फडके आणि निखिल गवई यांनी दृकश्राव्य पद्धतीने पूरपरिस्थिती आणि त्यावर काय उपाय करायला हवेत, असा अभ्यासपूर्ण अहवाल सादर केला. मात्र, तरीही ठोस उपाययोजना झाली नाही. आमदार महेंद्र थोरवे यांनी पूरपरिस्थितीवर लवकरात लवकर उपाययोजना करण्याचा इशारा दिला होता. त्यावर रेल्वे बोर्डाकडे प्रस्ताव सादर केला आहे. त्याच्या मंजुरीची आम्ही वाट पाहत आहोत, असे मध्य रेल्वे प्रशासनाने १५ नोव्हेंबर २०२१ रोजी कळवले. आता दीड महिन्यावर पावसाळा आल्यामुळे पुराची भीती रहिवाशांना वाटत आहे. त्यामुळे ३१ मेपूर्वी रेल्वे महाव्यवस्थापकांनी तातडीची सभा घेत १० जूनपर्यंत ठोस उपाययोजना करावी. अन्यथा कर्जत रेल्वे स्थानकात रेलरोको आंदोलन करण्यात येईल. याची सर्वस्वी जबाबदारी रेल्वे प्रशासनाची असेल, असा इशारा आमदार थोरवे यांनी दिला आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Ali22b35493 Txt Raigad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..