
पालीचे दगडी प्रवेशद्वार जमीनदोस्त
पाली, ता. ११ (वार्ताहर) : पाली-खोपोली राज्य महामार्गावर पालीच्या सीमेवर उंबरवाडी येथे भव्य दगडी प्रवेशद्वार (कमान) साधारण ५५ वर्षांपूर्वी उभारण्यात आले होते. अनेक वर्षांपासून या कमानीचे अवशेष शिल्लक राहिले होते. मात्र, आता पाली-खोपोली मार्गाच्या रुंदीकरणासाठी या प्रवेशद्वाराचे राहिलेले अवशेषही तोडण्यात आले. या प्रवेशद्वारासोबत अनेक आठवणी जोडल्या असल्याने यावेळी पालीकरांचे डोळे पाणावले.
अष्टविनायक तीर्थक्षेत्र म्हणून पाली गाव सर्वत्र प्रसिद्ध आहे. गावच्या सीमेवर पाली-खोपोली राज्य महामार्गावर उंबरवाडी नजीक १९६५-६७ मध्ये शिक्षण महर्षी व रायगड जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष दादासाहेब लिमये यांनी पुढाकार घेत शासकीय खर्चाने हे भव्य दगडी नक्षीकाम असलेले प्रवेशद्वार उभारले होते. त्यानंतर कित्येक वर्षे हे प्रवेशद्वार पालीची शान म्हणून रुबाबात उभे राहिले. परंतु, नागोठणे येथे जेव्हा आयपीसीएल (सध्याची रिलायन्स) कंपनीची उभारणी झाली, तेव्हा लागणारी साधने, यंत्रे ही मुंबई-पुणेमार्गे पालीवरून नेण्यात येत होती. ही मोठी यंत्रे घेऊन जाताना वाहनांना या प्रवेशद्वारा खालून जाता येत नसल्याने नाईलाजास्तव प्रवेशद्वाराची वरची बाजू तोडावी लागली. मात्र, आता रुंदीकरणामुळे राहिलेले अवशेषही तोडण्यात आले आहेत. इतर गावांमध्ये जसे प्रवेशद्वार गावची शोभा वाढवतात. त्याचप्रमाणे पालीसाठीही पुन्हा भव्य प्रवेशद्वार उभारण्यात यावे, अशी मागणी माजी ग्रामपंचायत सदस्य अमित निंबाळकर यांनी केली आहे.
-----
प्रवेशद्वाराच्या जागेवर जवळपास दीड कोटी रुपये खर्चून नव्याने भव्य प्रवेशद्वार उभारण्यात येणार आहे. यासाठी अंदाजपत्रक व प्रस्ताव कोकणभवन येथे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे.
- गीता पालरेचा, नगराध्यक्षा, पाली
पाली : खोपोली रस्त्यावरील तोडण्यात आलेले प्रवेशद्वार.
Web Title: Todays Latest Marathi News Ali22b35585 Txt Raigad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..