
मायेची सावली पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी
मायेची सावली पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी
आपल्या संस्कृतीत वृक्षाला देव मानण्यात आलेले आहे. संत महंतानीही आपल्या वाणीतून, लेखणीतून वृक्षलागवडीचा संदेश पेरला. आजच्या विज्ञानवादी युगात याचे महत्व वाढत आहे. वाढते प्रदुषण, अन्नाचा तुटवडा, वाढते तापमान, कमी होणारे पर्जन्यमान यामुळे जीवसृष्टी धोक्यात आलेली आहे. निरोगी जीवन जगायचे असेल, तर वृक्षलागवड करणे अत्यावश्यक आहे, हे पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी रेवंदडासारख्या लहानशा गावातून रुजविलेले विचार आजच्या युगासाठी किती गरजेचे आहेत, हे दिसून येते.
***
वृक्षवल्ली आम्हा सोयरी, हे आपल्या संतमहंतांनी सांगितलेच आहे. त्याची आधुनिक काळात किती गरज आहे हे महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांनी दिलेली शिकवण समाजात तळागाळात रुजवण्याचे काम त्यांची पुढील पिढी समर्थपणे करीत आहे. त्यांची पुढील पिढी पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी, डॉ. सचिनदादा धर्माधिकारी आणि त्यांचे श्रीसदस्य जोपासत आहेत. धर्माधिकारी यांनी आपल्या शिकवणी तळपत्या उन्हात रस्त्याने जाणार्या वाटसरुला या वृक्षाचे महत्व अधिक माहिती असते, आपला छोटासा संसार थाटण्यासाठी जागा शोधाणार्या पक्षाला वृक्षाचा आधार अधिक मोलाचा वाटतो. भूकेने व्याकुळ झालेल्या एखाद्या प्राण्याला झाडाखाली पडलेला फळ जगण्याची उर्जा देतो. संपूर्ण जीवसृष्टीचा समतोल या वृक्षांवर अवलंबून असतानाही मनुष्यप्राण्याने आपल्या हितासाठी दुर्लक्ष केले. यातूनच त्यांनी आपल्यावर संकट ओढावून घेतलेले असताना त्याला बाहेर काढण्यासाठी एका समृद्ध विचारांची गरज होती. ''डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान- रेवदंडा'' यांच्या माध्यमातून पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी, डॉ.सचिन धर्माधिकारी यांनी सुरू केले कार्य समाजामध्ये नवे चैतन्य निर्माण करणारे ठरत आहे. आज कोणत्याही रस्याने जाताना रंगीबेरंगी फुलांनी बहरेली झाडे उन्हाच्या चटक्यातही मनाला गारवा निर्माण करुन देतात. ''डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान- रेवदंडा'' च्या माध्यमातून श्री सदस्यांनी करोडो झाडे रायगड जिल्ह्यात लावली आहेत. त्यांचा हा वृक्षवल्ली जोपासण्याचा पसारा संपुर्ण जगभर पसरला असून त्यांचे हजारो श्रीसदस्य या मोहिमेत सहभागी होत असतात. शासकीय वृक्षलागवडीला जोड देत श्रीसदस्यांनी केलेली लागवड यशस्वी ठरत आहे. योग्य नियोजन, श्रीसदस्यांच्या मेहनतीमधील सातत्य यामुळे लावलेली झाडे मोठी होत आहेत. जेमतेम दहा वर्षांपूर्वी ही लावलेली झाडे असून त्यांची वाढ जोमाने होत आहे. शासकीय स्तरावरही वृक्षलागवडीची मोहिम दरवर्षी आखली जाते. या मोहिमेलाही श्रीसदस्यांनी केलेल्या वृक्षलागवडीमुळे हाताभार लागत आहे. ''डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान- रेवदंडा''चे कार्य जगभर पसरलेले आहे, जगातील विविध देशात असणार्या त्यांचे श्रीसदस्य वृक्षलागवडीचे महत्व आपल्या प्रत्यक्ष कृतीतून समजावून देत आहेत. रेवदंडा सारख्या लहानशा गावातून सुरु झालेली वृक्षलागवडीची मोहिम आता सर्वदूर होत असून याचे महत्व सर्वसामान्य लोकांना पटू लागले आहे. एका लहानशा रोपाला आधार देवून त्याची जोपासना केल्यास भविष्यात तयार होणारे मोठे वृक्ष आपल्या जीवनाला आधार देवू शकतात. ही शिकवण पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी जनसामान्यांमध्ये रुजवली आहे. डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या कार्याची दखल घेत नुकतेच डॉ. श्री. दत्तात्रेय नारायण तथा आप्पासाहेब यांना युरोपियन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी पॅरीस, फ्रांस यांच्या वतीने सामाजिक कार्याबद्दल “लिव्हिंग लेजंड" अवार्डने गौरविण्यात आले. धर्माधिकारी घराण्याची हीच समृद्ध परंपरा पुढच्या पिढीपर्यंत नेणारे त्यांचे चिरंजीव सचिनदादा धर्माधिकारी यांनाही याच संस्थेच्या वतीने सचिनदादा धर्माधिकारी यांना “मानद डॉक्टरेट” ही पदवी बहाल करण्यात आली. या पदवी बरोबरच फेम टाईम इंटरनॅशनल एक्सलंस अवार्ड या संस्थेच्या वतीने इंटरनॅशनल ग्लोबल लिडरशीप अॅवार्डने सन्मानित करण्यात आले.
****
सामाजिक परिवर्तवनाची चारशे वर्षाची परंपरा
समर्थ रामदासांच्या दासबोधाच्या निरूपणाचा वारसा वडील डॉ. नारायण विष्णू उर्फ नानासाहेब धर्माधिकारी
यांच्याकडून घेऊन तो समर्थ बैठकांच्या माध्यमातून अधिक प्रभावी करण्याचे आणि त्याला सामाजिक परिवर्तनाचा आधुनिक आयाम देण्याचे अनन्यसाधारण काम पद्मश्री डॉ. श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी करत आहेत. त्यांचा आज जन्मदिन आहे. आध्यात्म, शिक्षण, आरोग्य, समाजप्रबोधन आणि व्यसनमुक्ती या क्षेत्रांत त्यांनी प्रभावीपणे प्रबोधनाचे काम केले. योग्य वेळी भविष्याचा वेध घेत मानववंशाच्या हितासाठी पर्यावरण संवर्धनाच्या विचाराला प्राधान्य दिले. देश-परदेशातील हजारो बैठकांच्या माध्यमातून लाखो अनुयायांच्या मनात तो विचार शास्त्रशुद्ध पद्धतीने रुजविण्यात आप्पासाहेबांनी निरुपणातून यश संपादन केले आहे.
अलीकडच्या काळातील मोठ्या सामाजिक परिवर्तनाच्या यशस्वी चळवळीचे प्रत्यंतर देणारे असेच आहे. धर्माधिकारी घराण्यात चारशे वर्षांपासून समाजप्रबोधनाच्या कार्याची परंपरा आहे. ही परंपरा अद्यापही त्याच सक्षमपणे सुरु आहे. धर्माधिकारी यांच्या घराण्याचे मूळचे आडनाव शांडिल्य होते. त्यांच्या आठव्या पिढीतील पूर्वज गोविंद चिंतामण शांडिल्य हे स्वेच्छेने धर्मजागृतीचे काम करीत असत. दर्यासारंग सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांनी त्यांना सन्मानाने ''धर्माधिकारी'' ही पदवी बहाल केली आणि तेव्हापासून आजतागायत हे घराणे ''धर्माधिकारी'' आडनाव लावून त्यास समर्पक असे
धर्मजागृतीचे काम करीत आहेत. धर्माधिकारी घराण्याची चौथी पिढी असलेल्या आप्पासाहेबांचे चिरंजीव सचिनदादा, राहुलदादा, उमेशदादा हेही वडिलांच्याच निष्ठेने आणि तेवढ्याच तळमळीने याच समाजकार्यात सक्रीय आहेत.
दासबोधाच्या निरूपणाचे त्यांनी केलेले रसाळ निरूपण सद्यस्थितीत मराठीबरोबरच हिंदी, उडिया, तामिळ, बंगाली, कन्नड व इंग्रजीतूनही केले जाते. यासाठी सुरुवातीला महिला व पुरुषांचीच बैठक होत असे. मात्र, बालवयापासूनच संस्कार व्हावेत, म्हणून बालोपासना सुरू करण्यात आली. वस्तुत: समर्थ रामदासांच्या दासबोधातील एकेका समासाचे निरूपण करताना त्याला आजचे संदर्भ देणे, आधुनिक काळाशी ते सुसंगत असतील, याची काळजी घेणे, अशा सोप्या निरूपणातून विकारी मनांची मशागत करणे आणि अंतिमत: निर्व्यसनी समर्थ समाजाचे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांनी आयुष्य वेचले. समाजाला त्यांनी धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष अशा सर्वांगीण पुरुषार्थाची ओळख करून दिली. मानवाचा अपेक्षित विकास होऊ शकतो, यावर त्यांनी सदैव भर दिला. समर्थांनी
दासबोधातून सांगितलेला कोणताही सद्विचार हा केवळ मनात रुजून तेथेच थांबणे योग्य नाही; तर तो मनातून
डोक्यात आणि डोक्यातून प्रत्यक्ष कृतीत उतरला, तरच सर्वांचे भविष्य उज्ज्वल होऊ शकते, हा आप्पासाहेब मांडत असलेला विचार त्यांचे जगभरातील लाखो अनुयायी कृतीत उतरवताना दिसून येत आहेत. डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान या संस्थेची स्थापना करून मनामनात रुजविलेले विचार प्रत्यक्ष कृतीत उतरविण्यासाठी आप्पासाहेबांनी सामूहिक सुसूत्र नियोजनबद्ध व्यवस्था तयार केली. त्यातूनच पर्यावरण संवर्धनासाठी वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धन, जलस्त्रोत पुनरुज्जीवन, अखिल मानववंशाचे आरोग्य सुधारावे, यासाठी स्वच्छता अभियान अशा सामाजिक परिवर्तनाच्या सामूहिक चळवळी देशभरात सर्व राज्यांत उभ्या राहिल्या. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन राज्य सरकारने त्यांना राज्याचे ''स्वच्छता दूत'' म्हणून स्वीकारले; तर केंद्र सरकारने पद्मश्री'' प्रदान करून त्यांचा यथोचित गौरव केला. ही चारशे वर्षाची समृद्ध परंपरा अबाधित रहावी ही, पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्ताने ईश्वरचरणी प्रार्थना.....!
--
MAHENDRA DUSAR
MOB. 9209641960
TEL:- 02141 - 224833
Web Title: Todays Latest Marathi News Ali22b35623 Txt Raigad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..