
चौपाटी कुटी चौपाटी कुटी
प्रमोद जाधव ः अलिबाग
श्रीवर्धनमधील दिवेआगर व अलिबागमधील वरसोली समुद्रकिनारे पर्यटनासाठी महत्त्वाचे ठरत आहेत. या ठिकाणी पर्यटनाला चालना देण्यासाठी चौपाटी कुटी (बीच शॅक्स) उभारली जाणार आहे. त्यासाठी सीआरझेडच्या परवानगीचे काम सुरू असून लवकरच दोन्ही समुद्रकिनारी चौपाटी कुटी उभी राहणार आहे. ही कुटी पर्यटकांसाठी आकर्षण ठरणार आहे.
अलिबाग तालुक्यातील वरसोलीचा समुद्रकिनारा पर्यटकांच्या पसंतीला उतरला आहे. किनाऱ्यालगत सुरुची झाडे पर्यटकांना आकर्षक करतात. पर्यटकांना लाटांचा आनंद घेता यावा यासाठी बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. लहान मुलांना खेळण्यासाठी उद्यान आहे. किनाऱ्यापासून काही अंतरावर वरसोलीमध्ये पेशवेकालीन शंकर व भवानी देवीचे मंदिर, प्रतिपंढरपूर म्हणून ओळखले जाणारे विठ्ठल- रखुमाईचे मंदिर, खंडोबा मंदिर आहे. तसेच जवळच खांदेरी, उंदेरी किल्ला आहे.
समुद्राच्या किनारी खवय्यांसाठी भोजनाची व अन्य खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल आहेत. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी किनारी भागात सीसी टीव्ही, विजेचे दिवे बसविण्यात आले आहेत. वर्षाला जवळपास दोन लाख पर्यटक या ठिकाणी येतात.
दिवेआगारला अनेक पुरस्कार
श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर हे ऐतिहासिक व पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते. या गावाच्या प्रवेशद्वारासमोर बुराम निजामशहा यांचा शिलालेख आहे. ७ ते ८ व्या शतकातील राजे शिलार यांचा तो शिलालेख आहे. गावात प्रवेश केल्यावर सुवर्ण गणेशाचे मंदिर आहे. गावामध्ये रूपनारायण, गणपती व उत्तरेश्वर अशी तीन प्राचीन मंदिरे आहेत. दिवेआगर गावाने निर्मल ग्राम पुरस्कार, पर्यावरण रत्न, तंटामुक्त गाव असे अनेक पुरस्कार प्राप्त केले आहेत.
सीआरझेडच्या परवानगीची प्रतीक्षा
वरसोली व दिवेआगरमधील समुद्रकिनारी चौपाटी कुटी बांधली जाणार आहे. कुटीमुळे स्थानिकांना रोजगार मिळेल. शिवाय पर्यटनाला एक वेगळा दर्जा प्राप्त होईल. याठिकाणी प्रत्येकी दहा कुटी उभारल्या जाणार आहेत. चौपाटी कुटीमुळे गावातल्या गावातच बेरोजगार तरुणांना रोजगाराची दारे खुली होणार आहेत. वरसोली व दिवेआगरमधील किनारी कुटीसाठी जागाही निश्चित केली आहे. दोन्ही समुद्रकिनारी हे प्रकल्प बांधताना, सीआरझेडची परवानगी घेणे आवश्यक आहे. त्यानुसार परवानगी घेण्याचे काम सुरू आहे.
श्रीवर्धनमधील दिवेआगर, अलिबागमधील वरसोली समुद्रकिनारी चौपाटी कुटी बांधली जाणार आहे. कुटीमुळे स्थानिकांना रोजगार मिळेल. पर्यटन वाढीला चालना मिळेल. प्रकल्पासाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या परवानग्या घेण्याचे काम सुरू आहे. दोन महिन्यांत हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.
- अदिती तटकरे, पालकमंत्री, रायगड.
Web Title: Todays Latest Marathi News Ali22b35627 Txt Raigad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..