
वेश्वी परिसरात स्वच्छता मोहीम
अलिबाग, ता. २२ (बातमीदार) : तालुक्यातील जीतनगर येथील माणुसकी प्रतिष्ठान, रायगड जिल्हा परिषद पाणी व स्वच्छता मिशन, थळ येथील आरसीएफ कंपनी, वेश्वी ग्रामपंचायत व आय.ओ.रा. कॉटेजेस यांच्या संयुक्त विद्यमाने वेश्वी परिसरात प्लास्टिक व कचरा स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. वेश्वी येथील तलाव परिसरात पडलेला कचरा, प्लास्टिक गोळा करून त्याची योग्य ती विल्हेवाट लावण्यात आली. सुमारे एक टन इतका प्लास्टिक कचरा गोळा करून पुनर्प्रक्रियेसाठी पाठवण्यात आला आहे.
माणुसकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. राजाराम हुलवान यांच्या पुढाकाराने घेण्यात आलेल्या या उपक्रमाला नागरिकांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. डॉ. राजाराम हुलवान यांनी कचऱ्यामुळे आजार पसरतात. त्यामुळे आपला परिसर स्वच्छ ठेवून निरोगी कसे राहता येईल आणि निसर्गाचा समतोल कसा राखला जाईल याबद्दल मार्गदर्शन केले. आयओरा कॉटेजचे मालक व नॅचुरालिस्ट सागर म्हात्रे यांनी हवामान बदल, ग्लोबल वार्मिंगमुळे आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामचे उदाहरण देऊन मार्गदर्शन केले. वेश्वीचे माजी सरपंच प्रफुल पाटील यांनी ग्रामपंचायत स्वच्छ ठेवण्याचे आश्वासन देऊन स्वच्छता मोहिमेच्या कार्यात मोलाचा सहभाग दर्शवला. या वेळी अॅड. भूपेंद्र पाटील, संदीप वारगे आदी मान्यवरांसह नागरिक उपस्थित होते.
कचरा वर्गीकरण करा
परिसरात प्लास्टिक, कचरा, काचेच्या वस्तू, बॉटल्स टाकू नयेत. प्लास्टिक ३०० ते ४०० वर्षे नष्ट होत नाही. ते जाळले तर श्वसनाचे विकार होतात. पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होते. ओला व सुका कचरा वेगळा करावा, असे आवाहन रायगड जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता मिशनचे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक जयवंत गायकवाड यांनी नागरिकांना केले.
Web Title: Todays Latest Marathi News Ali22b35774 Txt Raigad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..