
गड व किल्ले जतन-संवर्धन समितीची पुनर्स्थापना
अलिबाग, ता. ३ : छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी जीवनाची नवीन पिढीला ओळख करून देण्यासाठी; तसेच राज्यातील गड व किल्ल्यांचे जतन-संवर्धन करण्याच्या दृष्टीने योग्य मार्गदर्शन मिळण्यासाठी सांस्कृतिक कार्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या गड संवर्धन समितीची बुधवारी (ता. ३०) शासन निर्णयान्वये पुनर्स्थापना करण्यात आली आहे. या समितीत कोकण विभागीय समिती सदस्य म्हणून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे अलिबाग येथील उपअभियंता प्रवीण कदम यांची निवड करण्यात आली आहे. गड व किल्ल्यांचे जतन-संवर्धनाच्या दृष्टीने मार्गदर्शन करण्यासाठी तत्कालीन सांस्कृतिक कार्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या ३० मार्च २०१५ च्या शासन निर्णयान्वये गड संवर्धन समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीला मुदतवाढ देण्यात आली होती. तसेच १८ जानेवारी २०२० च्या शासन निर्णयान्वये या गड संवर्धन समितीवरील अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या रद्द केल्या होत्या. आता या समितीची पुनर्स्थापना करण्यात आली आहे.