मिनी जलकुंड शेतकऱ्यांसाठी वरदान

मिनी जलकुंड शेतकऱ्यांसाठी वरदान

अलिबाग, ता. १२ (बातमीदार) ः भात पिकासह फळबागांची लागवडीला चालना मिळावी, यासाठी जिल्‍हा कृषी विभाग वेगवेगळे उपक्रम राबवत आहे. पनवेलमधील जिल्हा कृषी महोत्सवात मिनी जलकुंडाची प्रतिकृती तयार करण्यात आली होती. शेततळ्याच्या माध्यमातून फळबाग लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न यातून करण्यात आला. हे जलकुंड शेतकऱ्यांसाठी आकर्षण ठरत आहे.
पावसाचे पाणी साठवण्यासाठी अनेकजण प्लॅस्‍टिक टाकीचा वापर करतात. परंतु या टाक्यांमध्ये फक्त दहा हजार लिटर पाणी साठवणूक होते. त्यामुळे मे अखेरपर्यंत फळबागांना पुरेसा पाणी उपलब्ध होत नसल्याची ओरड नेहमीच होते. कृषी विभागाने, शेतकऱ्यांचा आर्थिक स्रोत वाढावा, यासाठी फळबाग लागवडीला चालना दिली आहे.
जिल्‍ह्यातील अनेक गाव-पाड्यांमध्ये जानेवारी ते मे या कालावधीत पाणीटंचाई निर्माण होते. पिकांवरही याचा परिणाम होतो. डोंगर उतारावर कमी खर्चात व कमी जागेत पाणी साठवण्यासाठी नवीन तंत्रज्ञान सुरू करण्यात आले आहे. आपत्कालीन परिस्थितीत फळबागेस संरक्षण देण्यासाठी कृषी विभागाने पुढाकार घेतला आहे.
सध्या पोलादपूर तालुक्‍यातील गोळवणीसह अन्य गावांत मिनी जलकुंभाचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. अर्धा गुंठे क्षेत्रामध्ये १५ मीटर लांबी, १५ मीटर रुंदी व तीन मीटर खोल असलेल्‍या मिनीजल कुंड उभारता येणार आहे. याची साठवण क्षमता साधारण ५० हजारांपेक्षा अधिक आहे. यामुळे जवळपास १०० झाडांना मुबलक पाणी मिळू शकेल.
खोदकाम करण्यापासून जलकुंडामध्ये प्लॅस्‍टिकचे आवरण लावण्यापासून साधारणतः एक लाख खर्च येतो. मात्र मिनी जलकुंभाचा खर्च निम्‍म्‍याहून कमी २६ हजार इतका येतो. कमी जागेत, पाण्याची जास्तीत जास्त साठवणूक जलकुंडामुळे होत असल्याने कृषी महोत्‍सवात मिनी जलकुंड सर्वांच्याच आकर्षणाचे केंद्र बनले.

कृषी महोत्‍सवात प्रतिकृती
दक्षिण रायगडमध्ये तीस शेतकऱ्यांनी जलकुंडाची उभारणी केली आहे. यातून सुमारे तीन हजारांहून अधिक झाडांची लागवड करण्यात आली आहे. जलकुंडाबाबत जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्यांना माहिती मिळावी, यासाठी कृषी महोत्सवात जलकुंडाची प्रतिकृती तयार करण्यात आली असून त्याची माहिती सहज व सोप्या पद्धतीने शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न केला आहे. हे जलकुंड बघण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी होत आहे.

पावसाचे पाणी साठवणूक करण्यासाठी मिनी जलकुंड शेतकऱ्यांकरिता उपयोगी आहे. दक्षिण रायगडमध्ये उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. जलकुंडामुळे कमी जागेत मुबलक पाणी साठवता येतो. त्याचा फायदा आपत्कालीन परिस्थितीत होण्यास मदत होईल. जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्यांनी मिनी जलकुंड उभारल्यास फळबाग लागवडीतून त्यांचा उत्पन्नाचे व रोजगाराचे साधन खुले होईल.
- सूरज पाटील, कृषी मंडळ अधिकारी, पोलादपूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com