
वीज दरवाढीचा प्रस्ताव रद्द करा
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. १ : महावितरणने दाखल केलेला वीज दरवाढ प्रस्ताव रद्द करावा, त्याचबरोबर सध्या अस्तित्वात असलेला वीजदर कमी करून अन्य राज्याप्रमाणे करावा, अशी मागणी महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. महावितरण कंपनीने आगामी दोन वर्षांमध्ये ६७,६४४ कोटी रुपये तुटीच्या भरपाईची मागणी केली आहे. ही मागणी सरासरी ३७ टक्के दरवाढीची आहे. यामुळे प्रति युनिट २.५५ रुपयांनी महाग होणार आहे, असे संघटनेचे म्हणणे आहे.
दरवाढीचा अतिरिक्त बोजा ग्राहकांवर पडणार आहे. ही दरवाढ पूर्णपणे रद्द करण्यात यावी व राज्यातील सध्याचे वीजदर कमी करून देशातील अन्य राज्यांच्या तुलनेने स्पर्धात्मक व समपातळीवर आणावेत, यासाठी महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेने राज्यव्यापी आंदोलन पुकारले होते. महावितरण कंपनीने सादर केलेल्या प्रस्तावाचा निषेध करण्यात आला. या वेळी रायगड जिल्हाध्यक्ष विजय खारकर यांच्या नेतृत्वाखाली अलिबाग तालुका अध्यक्ष सचिन पाटील, पदाधिकारी रवींद्र पाटील, श्रीकांत पाटील, राजेश बागवे, संदीप पाटील, प्रमोद खारकर यांनी उपजिल्हाधिकारी सर्जेराव म्हस्के-पाटील यांना निवेदन सादर केले.
उद्योग-व्यवसाय अडचणीत
महाराष्ट्रात सर्वाधिक दर असताना कोणतीही दरवाढ केली, तर त्याचे अनिष्ट परिणाम राज्याचा विकासावर होतील. त्याचबरोबर इंधन समायोजन आकारासह सध्या लागू असलेल्या औद्योगिक वीज दरामुळे राज्यातील अनेक उद्योग अडचणीत आले आहेत. असे उद्योग पुन्हा दरवाढ झाल्यास बंद पडतील व शेजारील राज्यात जातील, असे संघटनेने निवेदनात नमूद केले आहे.