
अलिबाग समुद्रकिनारी संगीत सध्या
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. ६ : रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करणाऱ्या आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेकडून यंदा अनेक सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून अलिबाग समुद्रकिनाऱ्यावर रविवारी (ता. ७) आदर्श संगीत संध्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला असल्याची माहिती पतसंस्थेचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी दिली.
पतसंस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी आदर्श भुवन येथे नुकतीच पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. पतसंस्थेचे संस्थापक सुरेश पाटील, उपाध्यक्ष कैलास जगे तसेच संचालक सतीश प्रधान, अनंत म्हात्रे, विलाप सरतांडेल, सुरेश गावंड, अॅड. रेश्मा पाटील, अॅड. वर्षा शेठ, सीए संजय राऊत, डॉ. मकरंद आठवले हे या वेळी उपस्थित होते.
रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त कुरुळ येथील आरसीएफ वसाहतीमधील गतिमंद मुलांच्या शाळेत गणवेष वाटप करण्यात येणार आहे. रविवारी होणाऱ्या आदर्श संगीत संध्या कार्यक्रमात पोलिस कल्याण निधीसाठी २ लाख ११ हजार १११ रुपये देण्यात येणार आहेत. पतसंस्थेने अलिबागमधील अनाथ व निराधार बालकांसाठी कार्यरत असलेली वात्सल्य ट्रस्टलाही वेळोवेळी आर्थिक मदत केली आहे. रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त काही शाखांमध्ये नेत्रचिकित्सा शिबिर आयोजित केले होते. ज्यांच्या डोळ्यामध्ये मोतीबिंदू आढळून आले, त्यांच्या शस्त्रक्रियेचा खर्च आदर्शतर्फे करण्यात आला. पाली तालुक्यातील आदिवासी शाळेला एक लाख रुपयांची मदत देण्यात आली.
संस्थेची ५०० कोटींची उलाढाल
१ ऑक्टोबर १९९८ रोजी भाड्याच्या जागेत आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना करण्यात आली. पहिल्या वर्षी संस्थेचे भागभांडवल रु. ३० हजार होते तर २५ लाख रुपयांच्या ठेवी होत्या. २५ वर्षांमध्ये आदर्शने एकत्रित व्यवसायाचा ५०० कोटींचा पल्ला ओलांडला आहे. सध्या आदर्शच्या १६ शाखा असून त्यापैकी ७ शाखा स्वमालकीच्या जागेत आहेत. रायगडसह सहा जिल्ह्यामध्ये संस्थेचे कार्यक्षेत्र आहे.