पालीत नालेसफाईला मुहू्र्त सापडेना

पालीत नालेसफाईला मुहू्र्त सापडेना

पालीमधील नालेसफाई रखडली
नागरिकांसह भाविकांत नाराजी

पाली, ता. ११ (वार्ताहर) ः पावसाळा अवघ्‍या महिनाभरावर आला आहे, मात्र तरीही पाली शहरातील नालेसफाईला अजून सुरुवात झालेली नाही. नाल्यातील कचरा वेळेत न काढल्‍यास, पूरस्‍थिती निर्माण होण्याची शक्‍यता आहे. अनेक ठिकाणचे नाले, गटारे तुटलेले आहेत, त्‍यांनी दुरुस्‍ती होणे गरजेचे आहे. तर काही नाल्यात झाडी-झुडपे वाढले असून गाळ साचला आहे. त्‍यामुळे लवकरात लवकर कामे पूर्ण व्हावीत, अशी मागणी नागरिक तसेच भाविकांकडून करण्यात येत आहे.
शहरातील नाल्‍यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिकच्या पिशव्या, बॉटल्‍स, थमॉकोल आदी कचरा साचला आहे. अनेक ठिकाणी नाले तुंबल्‍याने दुर्गंधी पसरली आहे. तर काही ठिकाणी सांडपाणी रस्‍त्‍यावर आल्‍याने नागरिकांना यातूनच प्रवास करावा लागता आहे. अष्‍टविनायकांपैकी एक तीर्थक्षेत्र असल्‍याने बल्‍लाळेश्‍वराच्या दर्शनासाठी वर्षभर लाखो भाविकांची वर्दळ असते. त्‍यांनाही कचऱ्याचा, दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतो.
शहरातील एसटी बस स्थानकासमोरील मोठा नाला, भोई आळी, आगर आळी, राम आळी, खडक आळी, कुंभार आळी, मधली आळी, सोनार आळी, कासार आळी, बल्लाळेश्वर नगर, कासार आळी व बल्लाळेश्वर मंदिराच्या भोवतालच्या परिसरातील नाले सफाईची कामे बाकी आहेत. याठिकाणी साठलेल्या सांडपाण्यामुळे परिसरात घाण व दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले. त्‍यामुळे लवकरात लवकर शहरातील नालेसफाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून नगरपंचायत प्रशासनाकडे करण्यात आली आहे.

पावसाळ्यापूर्वी नालेसफाई व औषध फवारणीची कामे वेळेत होणे आवश्यक आहे. अन्यथा नाले तुंबून पूरस्थिती निर्माण होण्याचा शक्‍यता आहे. नालेसफाई व स्वच्छतेसंदर्भात लवकर उपाययोजना करावी. नागरिकांनी प्लास्टिक बॉटल, पिशव्या व घरातील कचरा गटारे किंवा नाल्यात टाकू नये.
- अमित निंबाळकर, माजी ग्रामपंचायत सदस्य, पाली

नालेसफाई संदर्भात गुरुवारी (ता.११) बैठक घेण्यात आली. पावसाळ्यापूर्वी नालेसफाई पूर्ण केली जाईल. यासाठी आवश्यक नियोजन, साधने व निधीची तरतूद करण्यात आली आहे. नगरपंचायतीमार्फत नियमित नालेसफाईची कामे केली जातील.
- प्रणाली शेळके, नगराध्यक्षा, पाली नगरपंचायत

पाली ः बस स्थानकासमोरील नाला कचऱ्यामुळे तुंबला आहे.

...................

पाताळगंगामध्ये नालेसफाईची मागणी

रसायनी, ता. ११ (बातमीदार) : रसायनीत पाताळगंगा एमआयडीसी क्षेत्रात पावसाळ्यापूर्वी नालेसफाईचे कामे अजून सुरू झालेली नाहीत. पूरस्‍थिती टाळण्यासाठी लवकरात लवकर कामे सुरू करावीत, अशी मागणी परिसरातील कारखानदार व नागरिकांकडून करण्यात येत आहे.
पाताळगंगा औद्योगिक क्षेत्र, अतिरिक्त औद्योगिक क्षेत्रातील कारखाने आणि वासांबे-मोहोपाडा येथील कामगार वसाहतीत लाखो कामगार व स्‍थानिकांची वर्दळ असते. पावसाळ्यात रस्त्यालगतचे नाले आणि गटार तुंबून कारखानदारांचे तसेच नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान टळावे, वाहतुकीची कोंडी होऊ नये, तसेच कचऱ्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून एमआयडीसी क्षेत्रात नालेसफाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
नालेसफाईबाबत पाताळगंगा औद्योगिक क्षेत्र प्रशासनाकडे विचारणा केली असता, निविदा मागवण्यात आल्‍या होत्‍या, मात्र काही अडचणींमुळे प्रकिया पूर्ण झाली नाही. आता पुन्हा निविदा मागणवण्यात आल्‍या असून ही प्रक्रिया १७ मे रोजी पूर्ण होईल. त्यानंतर नालेसफाईचे कामे करण्यात येतील, असे सांगण्यात आले.

रसायनी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com