
कोकणातील गावांना सर्वोत्तम पर्यटन गाव नामांकनाची संधी
दुर्लक्षित गावांना ''सर्वोत्तम पर्यटन गाव''ची संधी
यूएनडब्ल्यूटीओमार्फत नामांकनासाठी अर्ज करण्याचे आवाहन
सुनील पाटकर, महाड
कोकण म्हणजे जैवविविधतेने आणि नैसर्गिक समृद्धीने नटलेले ठिकाण. निळाशार समुद्रकिनारे, माडाची बने, ऐतिहासिक गडकिल्ले, जलदुर्ग, विविध धार्मिकस्थळे, शांत खाडीतील जलसफरी हे सारे कोकणात अनुभवता येते. यामुळेच गेल्या काही वर्षांत अनेक गावे पर्यटनाच्या नकाशावर आली आहेत. निसर्गसौंदर्याने नटलेल्या या गावांना आता सर्वोत्तम पर्यटन गाव (बेस्ट टुरिझम व्हिलेज) नामांकनाची संधी उपलब्ध झाली आहे. युनाएटेड नेशन्स वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशनने (यूएनडब्ल्यूटीओ) कोकणातील दुर्लक्षित गावांनाही जगाच्या पातळीवर प्रसिद्धी देण्याची संधी दिली आहे. यामुळे कोकणातील पर्यटनाला चालना मिळेल. तसेच आंतरराष्ट्रीय पर्यटकांचा ओघ वाढण्यास मदत होईल.
कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या गावांना नामांकनासाठी यूएनडब्ल्यूटीओमार्फत मिळालेल्या सुवर्णसंधीचा फायदा घेता येणार आहे. शिवरायांचा इतिहास सांगणारा रायगड, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सत्याग्रह केलेले चवदार तळे, दासबोधांची जननी शिवधरघळ, अलिबागपासून मालवणपर्यंतचा समुद्रकिनारा, महड व पालीतील गणेशमंदिरे, दिवेआगर, हरिहरेश्वर, मुरूड जंजिरा, माथेरान अशी अनेक ठिकाणे, पौराणिक दाखल्यासह येथे आहेत. थंड हवेच्या ठिकाणांसोबत गरम पाण्याची कुंडेही आहेत. ही गावे आता पर्यटकांनी गजबजत आहेत. तर काही ठिकाणे आजही अनवट आहेत. या सर्वांना सर्वोत्तम पर्यटन गाव नामांकनासाठी प्रयत्न करणे शक्य होणार आहे.
रायगड जिल्ह्यातील निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या आणि पर्यटनाच्यादृष्टीने महत्त्व असलेल्या गावांना ''सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव'' हे नामांकन मिळण्यासाठी यूएनडब्ल्यूटीओ यांनी १५ मेपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन केले आहे. यासाठी http://www.unwto.org/tourism-villages/en/ या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करता येतील. अधिक माहितीसाठी www.unwto.org या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
मूल्यांकन होणार
ऑनलाईन अर्ज प्राप्त झाल्यानंतर त्याची यूएनडब्ल्यूटीओच्या सल्लागार मंडळामार्फत काही मुद्द्यांच्या आधारे मूल्यांकन केले जाणार आहे. यात नैसर्गिक व सांस्कृतिक संसाधनांची राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय स्तरावर ओळख, सांस्कृतिक संसाधनाचे जतन व प्रसिद्धीसाठी उपाययोजना प्रसार, पुढाकार, आर्थिक शाश्वतता, सामाजिक शाश्वतता, पर्यावरण शाश्वतता, नैसर्गिक संसाधनांचे जतन व संवर्धनसाठी उपाययोजना, वातावरणीय बदल प्रतिकारासाठी उपाययोजना, प्लास्टिक वापरावर नियंत्रण पुढाकार व प्रसार, पर्यटन विकास व मूल्य साखळी एकात्मिकरण, सुशासन व पर्यटन प्राधान्यकरण, पायाभूत सोयी सुविधा, रस्ते सुविधा व आधुनिक संपर्क साधने, आरोग्य, सुरक्षा व सुरक्षितता योजना, नैसर्गिक आपत्ती निवारण योजना या मुद्द्यांच्याआधारे यूएनडब्ल्यूटीओ सल्लागार मंडळातर्फे मूल्यांकन केले जाणार आहे.
.....
सर्वोत्तम पर्यटन गाव नामांकनाची संधी कोकणातील गावांना उपलब्ध झाली आहे. आपल्या गावाचे नाव जागतिक पातळीवर नेण्यासाठी जास्तीत जास्त गावांनी सहभाग घ्यावा.
- हनुमंत हेडे, उपसंचालक, कोकण पर्यटन विभाग
-------------
दिवेआगर समुद्रकिनारा
Web Title: Todays Latest Marathi News Mah22b07666 Txt Raigad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..