
जलजीवन योजनेकडे मविआकडून दुर्लक्ष
महाड, ता. ८ (बातमीदार) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव होईल म्हणून महाविकास आघाडी सरकारने जलजीवन मिशन योजना महाराष्ट्रात प्रभावीपणे राबविली नाही, असा टीका केंद्रीय जल शक्ती आणि खाद्य प्रसारण मंत्री प्रल्हादसिंह पटेल यांनी केली.
भारतीय जनता पक्षातर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्याने रायगड जिल्ह्यात विशेष जनसंपर्क अभियान सुरू केले आहे. याची सुरुवात केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी नुकतीच महाडमध्ये केली. कार्यक्रमाला पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, पेणचे आमदार रवींद्र पाटील, क्लस्टर संयोजक संजय टंडन, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजेश मपारा, माजी आमदार धैर्यशील पाटील, रायगड जिल्हा प्रभारी अतुल काळशेकर, रायगड लोकसभा विस्तारक अविनाश कोळी, जिल्हा सरचिटणीस बिपिन म्हामूणकर,जिल्हा महिला अध्यक्षा हेमा मानकर उपस्थित होते.
समाजातील विविध घटकांशी संपर्क, ज्येष्ठ कार्यकर्त्यांशी संवाद साधून थेट गावागावातील मतदारांपर्यंत केंद्र सरकारने नऊ वर्षात केलेल्या कामांची माहिती पोहोचविण्यासाठी अभियान सुरू केले आहे. यावेळी पटेल यांनी जल जीवन मिशन योजना, शौचालय, ग्रामीण पाणी पुरवठा, घरकुल योजना, उज्ज्वला योजना अशा विविध योजनांचा आढावा घेतला.
भरड धान्य उत्पादनावर पंतप्रधानांनी विशेष लक्ष दिले असून आता आंतरराष्ट्रीय पातळीवर ७४ देशांमध्ये भरड धान्य वर्ष साजरे केले जात असल्याचा उल्लेख त्यांनी केला. मोदी सरकारच्या काळामध्ये विकास कामांबरोबरच देशाची प्रगती होत आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीने जलजीवन योजना प्रभावीपणे राबवली नाही. पाण्याचे प्रमुख स्त्रोत तसेच इतर अडचणी असल्यास त्यांची नक्की सोडवणूक केली जाईल, अशी खात्री पटेल यांनी दिली. यावेळी स्लाईड शोच्या माध्यमातून केंद्र सरकारने राबवलेल्या विविध विकास कामांची माहिती देण्यात आली.
महाड ः
................
देशातील विदेशी गुंतवणुकीत वाढ - संजय टंडन
वडखळ (बातमीदार) ः देशाच्या प्रगतीत व्यापारी वर्गाची भूमिका महत्त्वाची आहे. भारतातील विविधतेत असलेली एकता पाहून विदेशी गुंतवणूक वाढल्याचे प्रतिपादन चंडीगड भाजपचे अध्यक्ष संजय टंडन यांनी पेण येथे केले.
भाजप महाजनसंपर्क अभियानअंतर्गत रायगड जिल्ह्यातील व्यापारी वर्गाचे संमेलन पेणमध्ये आयोजित केले होते. यावेळी ते बोलत होते. दहा वर्षात संपूर्ण भारत डिजिटल झाला असून जगातील ४६ टक्के डिजिटल पेमेंट भारतीय करतात. छोट्या-छोट्या गावांतही डिजिटल व्यवहार होतात. दहा वर्षांपूर्वी भारतीय अर्थव्यवस्था जगात दहाव्या नंबरवर होती, आज पाचव्या क्रमांकावर आणण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
जगातील मोठ्या कंपन्या चीनमधून भारतात येत आहे. देशाने केवळ शस्त्र निर्मिती केली नाही तर दुसऱ्या देशालाही शस्त्र पुरवली आहेत. आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार होत असल्याचे टंडन यांनी सांगितले.
वडखळ ः पेण येथील भाजप संवाद यात्रेत संजय टंडन यांनी मार्गदर्शन केले.