
पाण्याची पर्यायी व्यवस्था नसल्याने गोराईवासीय संतप्त
मुंबई, ता. ४ : महापालिकेतर्फे बोरिवली पश्चिम गोराई परिसरातील ‘आर मध्य’ विभाग परिसरातील १५०० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी वळवण्याचे काम बुधवार-गुरुवारी करण्यात येणार असले, तरी मंगळवारपासूनच पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला. त्यामुळे गोराई परिसरातील रहिवासी संतप्त झाले आहेत. पालिकेने जाहीर केलेल्या वेळेच्या आधीच पाणीपुरवठा बंद केला; पण पर्यायी व्यवस्था का केली नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
महापालिकेतर्फे ५ मे रोजी रात्री ११.५५ वाजल्यापासून ६ मे २०२२ रोजी रात्री ११.५५ पर्यंत काम हाती घेण्यात आले आहे. दरम्यानच्या कालावधीत ‘आर मध्य’ व ‘आर उत्तर’ विभागातील काही परिसरांमध्ये पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे; मात्र मंगळवारी सकाळपासूनच पाणीपुरवठा बंद झाल्याने गोराईतील राहिवाशांची तारांबळ उडाली. काही कामामुळे पाणीपुरवठा बंद केला हे मान्य; परंतु पर्यायी व्यवस्था का केली नाही, असा प्रश्न रहिवासी मुकुंद गमरे यांनी विचारला आहे. पाण्याची समस्या आताची नाही, तर दीडदोन वर्षांपासूनची आहे. वारंवार असे होत असल्याने रहिवासी त्रस्त आहेत, असे रहिवासी रमेश झेंडे म्हणाले. पालिकेने तातडीने तोडगा काढावा, अशी मागणीही त्यांनी केली.
Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06063 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..