
उष्णतेच्या लाटांचा ‘ताप’ वाढणार
मुंबई, ता. ७ : गेल्या १२२ वर्षांतील सर्वाधिक उष्ण महिना यंदा मार्च महिन्यात अनुभवास आला. याच कालावधीत वायव्य आणि उष्ण भारत सर्वाधिक उष्ण असल्याने भविष्यात एप्रिल महिन्यातही अशी स्थिती अनुभवास येऊ शकते, असा इशारा ‘स्कायमेट वेदर’ने दिला आहे.
सध्या भारतातील उष्णतेच्या लाटा इतिहासातील उच्चांकी असून दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या कमाल तापमानामुळे देशातील जवळपास १५ हून अधिक राज्ये होरपळून निघत आहेत. भारत आणि शेजारील पाकिस्तानात येणाऱ्या उष्णतेच्या लाटा जगभरात चिंतेचा विषय बनल्या आहेत. साधारणपणे मार्च महिन्यात एक दिवस उष्णतेची लाट अपेक्षित असताना प्रत्यक्षात ती तीन दिवस आली. तसेच एप्रिलमध्ये तीन दिवसांऐवजी दहा दिवस उष्णतेची लाट आली.
गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील अनेक शहरांतील तापमान सरासरी ४४ ते ४६ अंश सेल्सिअस होते. काही ठिकाणी पारा ४७ अंशांपर्यंतही पोहोचला होता. मे आणि जून या उन्हाळ्याच्या मुख्य महिन्यांपेक्षा मार्च आणि एप्रिलमध्ये तापमान अधिक असल्याचे वास्तव तज्ज्ञांनी यापूर्वी मांडले. देशभरातील तापमानाच्या स्थितीवर जागतिक तापमानवाढीचा मोठा परिणाम होत असल्याचे सध्याच्या दीर्घकालीन उष्णतेच्या लाटांवरून स्पष्ट होते. गेल्या काही दशकांत उष्णतेच्या लाटांची वारंवारता आणि तीव्रता मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.
--
परिणाम भयावह
वातावरण बदलामुळे हवामानाचे स्वरूपदेखील बदलत आहे. याचा परिणाम म्हणून भविष्यात भयंकर प्रकारचे उष्मासंकट सोसावे लागू शकते. पश्चिमी प्रकोप निवळण्याची प्रक्रिया विस्कळित होत आहे. परिणामी, प्रतिचक्रवात अधिक बळकट होत आहेत. त्यामुळे अचानक वाऱ्याची चक्राकार स्थिती निर्माण होऊन विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
......
प्रतिचक्रवातामुळे उष्ण वारे वायव्य भारतातून मध्य आणि पश्चिम भारतात दीर्घकाळासाठी पाठवले जातात. परिणामी उष्णतेच्या लाटा निर्माण होतात. जागतिक तापमानवाढीमुळे वाऱ्यांची उष्णता वाढली असून उष्णतेच्या लाटांची तीव्रताही वाढली आहे.
- महेश पलवत, उपाध्यक्ष, स्कायमेट वेदर.
Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06135 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..