
म्हाडाकडून ५० टक्के इमारतींचे सर्वेक्षण
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळामार्फत मुंबई शहर बेटावरील इमारतींचे पावसाळापूर्व सर्वेक्षण केले जाते. परंतु पावसाळा तोंडावर आला तरी हे सर्वेक्षण अपूर्णच असल्याचे समोर आले आहे. मंडळामार्फत आतापर्यंत केवळ ५० टक्के इमारतींचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. येत्या १० दिवसात सर्वेक्षण पूर्ण करण्याचे लक्ष्य मंडळाने ठेवले आहे.
मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या अखत्यारीत १४ हजार ७५५ उपकर प्राप्त इमारती जुन्या आणि जीर्ण अवस्थेत आहेत. दरवर्षी या इमारतींचे पावसाळ्यापूर्वी सर्वेक्षण केले जाते. गेल्या वर्षी २१ इमारती अतिधोकादायक जाहीर करण्यात आल्या होत्या. मात्र या इमारतींमधील रहिवाशांनी मुंबईत संक्रमण शिबिर उपलब्ध करून देण्याची विनंती केल्याने रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम रखडले होते. यंदा मंडळाने पावसाळ्यापूर्वी सर्वेक्षण पूर्ण करून धोकादायक इमारतींमधील रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याचा निर्धार केला आहे. त्यानुसार उपकर प्राप्त इमारतींचे पावसाळापूर्व सर्वेक्षण सुरू झाले आहे.
आतापर्यंत म्हाडा मंडळाने सर्वेक्षणाचे ५० टक्के काम पूर्ण केले आहे. उर्वरित इमारतींच्या सर्वेक्षणाचे काम १० दिवसात पूर्ण करण्यात येईल.
- अरुण डोंगरे, मुख्य अधिकारी, म्हाडा मंडळ
Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06179 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..