
गोरक्षकांवर हल्ल्याप्रकरणी दोघांना सशर्त जामीन
मुंबई, ता. १२ : गोरक्षकांवर केलेल्या हल्ल्याच्या आरोपात गुन्हा दाखल झालेल्या दोघांना मुंबई सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला.
जानेवारी महिन्यात एका जमावाने काही गोरक्षकांवर कुर्ला येथे हल्ला केला होता. या प्रकरणी काही जणांना स्थानिक पोलिसांनी अटक केली होती. त्यापैकी दोन आरोपींनी जामिनासाठी अर्ज केला होता. यावर न्या. जी. बी. गुरव यांच्यापुढे शनिवारी सुनावणी झाली. पोलिसांनी या अर्जाला विरोध केला होता; मात्र या संपूर्ण प्रकरणात अर्जदारांचा कोणताही संबंध नाही, असा युक्तिवाद आरोपींच्या वतीने ॲड. सना खान यांनी केला.
या प्रकरणात तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र दाखल झाले आहे. जमावाने तक्रारदार आणि त्याच्या मित्रावर हल्ला केला, असे फिर्यादीवरून स्पष्ट होते. तसेच जमावाकडील हत्यारे पोलिसांनी जप्त केली आहेत; मात्र अर्जदारांचा विशिष्ट सहभाग यामध्ये स्पष्ट केलेला नाही, असे निरीक्षण नोंदवून न्यायालयाने आरोपींना जामीन मंजूर केला.
---
घटना काय होती?
फिर्यादीनुसार, कुर्ल्यातील कसाईखान्यात गोवंश हत्येसाठी टेम्पो येणार आहे, अशी खबर तक्रारदारांना मिळाली होती. त्यामुळे त्यांनी पोलिसांना घेऊन परिसरात पाहणी केली. तेव्हा झालेल्या बाचाबाचीमध्ये हा प्रकार घडला, असे तक्रारीत म्हटले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06217 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..