
वाढत्या रुग्णसंख्येतून समूह संसर्गाची भीती
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाबाधितांची संख्या धीम्या गतीने वाढत आहे. एप्रिल महिन्यात ०.४ टक्के ते ०.७ टक्के अशा सरासरीत असणारी पॉझिटिव्हीटीची टक्केवारी अलीकडे १ टक्क्यांपर्यंत पोहोचल्याचे दिसते. त्यामुळे कोरोना विषाणू समूह संसर्गाच्या कक्षेत तर नाही ना, अशी शंका उपस्थित करण्यात येत आहे.
राज्याचा आठवड्याचा कोरोना पॉझिटिव्हिटी दराच्या विश्लेषणातून ही बाब ध्यानात येत आहे. दरम्यान, आरोग्य विभागाच्या माहितीनुसार लाट किंवा समूह संसर्गाचा अंदाज करण्यास एखादा नवा व्हेरियंट आवश्यक असून तूर्तास तसे काही दिसून येत नसल्याचे आरोग्य अधिकाऱ्याने स्पष्ट केले. दरम्यान, सध्या नवे रुग्ण रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण कमी दर्शवत असल्याची बाब दिलासादायी आहे. १४०० सक्रिय रुग्णांपैकी ३.३ टक्केच रुग्ण रुग्णालयात दाखल होत आहेत. तसेच रुग्णालयात दाखल असलेल्या ४५ रुग्णापैकी १० रुग्ण गंभीर स्थितीत आहेत. आता मास्क मुक्ती केल्यापासून महिना उलटला तरी देखील रुग्णसंख्या चिंतनीय नसल्याचे तज्ज्ञ बोलत आहेत.
कोरोना स्थिती नियंत्रणात!
राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांच्या मते कोरोनाची सद्यस्थिती बऱ्यापैकी नियंत्रणात आहे. गेल्या महिन्याभराची रुग्ण संख्या पाहिल्यास एप्रिलमध्ये सरासरी १३० वर होणारी रुग्णसंख्या मे महिन्यात २०० ते २५० वर पोहोचली आहे. मात्र यातील ९० टक्के रुग्ण लक्षणरहित असून रुग्णालयात दाखल होणाऱ्यांमध्ये वाढ झालेली दिसून येत नाही. तसेच एखाद्या नव्या व्हेरियंटच्या अंदाजा शिवाय नव्या लाटेचा अंदाज ही करू शकत नसल्याचे डॉ. आवटे यांनी स्पष्ट केले.
Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06244 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..