
मुंबई : ध्वनीप्रदुषणाच्या आरोपातील दोघांची सबळ पुराव्याअभावी सुटका
मुंबई, ता.१८ : गणेशोत्सवमध्ये विसर्जन मिरवणुकीत कर्कश आवाज करून ध्वनिप्रदूषण केल्याचा आरोप असलेल्या दोघांना मुलुंड महानगर दंडाधिकारी न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी दोषमुक्त केले आहे. भांडुप पूर्वेकडील एका विसर्जन मिरवणुकीत ट्रकवर ध्वनिक्षेपक लावून मिरवणुकीत सहभागी झालेल्या दोघांविरोधात पोलिसांनी सप्टेंबर २००९ मध्ये गुन्हा दाखल केला होता. या ध्वनिक्षेपकाच्या आवाजाची पातळी १२७ डेसिबल होती. सर्वसाधारणपणे ही मर्यादा सुमारे ९५.५ डेसिबल असायला हवी. त्यामुळे त्यांच्यावर पर्यावरण संरक्षण कायद्याच्या कलम १५ नुसार ध्वनिप्रदूषण केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता.
अभियोग पक्षाने चार साक्षीदारांची जबानी नोंदवली होती. हे सर्व पोलिस कर्मचारी असून त्यांनी ध्वनी पातळी मोजली होती. मात्र, विसर्जन दिवशी संध्याकाळी अनेक मंडळांच्या मिरवणुका एकापाठोपाठ एक सुरू होत्या. त्यामुळे आरोपींच्या ध्वनी पातळीबाबत संभ्रम निर्माण होतो, यामध्ये अन्य मंडळांच्या ध्वनिप्रदूषणाची मोजणी देखील झाली असावी, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. तसेच यादिवशी हजारो लोक रस्त्यावर उभे असतात. अशा वेळी मोजणी करताना गोंधळ होण्याची शक्यता आहे, असे मत न्यायालयाने व्यक्त केले आणि आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06312 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..