
आमच्याकडून अटींचे उल्लंघन नाही
मुंबई, ता. १८ : हनुमान चालिसा पठण प्रकरणातील राणा दाम्पत्याने जामीन अटींचे उल्लंघन केलेले नाही, असा दावा बुधवारी विशेष न्यायालयात प्रतिज्ञापत्राद्वारे केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा पठणाचे आव्हान राणा दाम्पत्याने दिले होते. त्यानंतर मुंबई पोलिसांनी त्यांना राजद्रोहासह विविध गुन्ह्यांतर्गत अटक केली होती. बारा दिवस तुरुंगात घालवण्यानंतर राणा दाम्पत्याला विशेष न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला होता.
राणा दाम्पत्याला जामीन देताना न्यायालयाने त्यांना माध्यमांशी या प्रकरणावर भाष्य न करण्याचे व पुन्हा असे वर्तन न करण्याची अट घातली होती, परंतु माध्यमांशी बोलताना राणा दाम्पत्याने न्यायालयीन अटी-शर्तींचे उल्लंघन केले, त्यामुळे त्यांचा जामीन रद्द करावा, असा अर्ज पोलिसांनी न्यायालयात केला होता. त्यावर बुधवारी विशेष न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयीन अटींचे उल्लंघन आम्ही केले नाही, पोलिसांनी कोणतेही ठोस कारण जामीन रद्द करण्यासाठी दिलेले नाही. पालिकेने आमच्या खार निवासस्थानाला नोटीस बजावली आहे, त्यावर माध्यमांना प्रतिक्रिया दिली, असे प्रतिज्ञापत्र राणा यांनी दाखल केले. राज्याबाहेर असल्यामुळे ते न्यायालयात हजर राहू शकले नाही. ॲड. रिझवान मर्चंट यांनी त्यांची बाजू मांडली. राजद्रोहाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे जामीन थेट रद्द करता येणार नाही, असा युक्तिवाद त्यांनी केला.
जामिनावर असताना चिथावणीखोर विधाने!
लोकप्रतिनिधी असूनही राणा यांना कायद्याचे सर्वसाधारण ज्ञान नसणे हे न पटणारे आहे. जामिनावर असताना त्यांनी चिथावणीखोर विधाने केली आहेत, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी केला. तूर्तास पोलिस कठोर कारवाई करणार नाहीत, असे या वेळी पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले. न्यायालयाने याची नोंद घेऊन १५ जूनपर्यंत सुनावणी तहकूब केली आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06313 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..