
नालेसफाईच्या डेडलाईनचे ‘टार्गेट’
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : पावसाळा तोंडावर आल्याने मुंबई पालिका प्रशासनाला यंदा कोणत्याही परिस्थितीत आपल्या हद्दीतील नालेसफाईची कामे ३१ मे पूर्वी पूर्ण करायची आहेत. त्या अनुषंगाने प्रशासनाने नालेसफाईच्या कामांचा आढावा घेण्याचा सपाटा लावला आहे. आज पालिका आणि रेल्वे प्रशासनाच्या संयुक्त पथकाने रेल्वे रुळाजवळील नाल्यांच्या कामांची पाहणी केली. यावेळी रेल्वे रुळांखालील बंदिस्त मार्गांची (कल्व्हर्ट) साफसफाई समाधानकारक झाल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे.
मुंबई महानगरात पावसाळापूर्व उपाययोजनांसाठी करण्यात येत असलेल्या कामांमध्ये नाल्यांमधील गाळ काढण्यासह नाल्यांचे रुंदीकरण, रेल्वे रुळाखालील व इतर ठिकाणीदेखील बंदिस्त मार्गांची स्वच्छता करणे आदी कामांचा समावेश आहे. त्यानुसार यंदाही मुंबई पालिकेने मध्य व पश्चिम रेल्वे प्रशासनासमवेत मिळून रेल्वे हद्दीतील व त्यालगतच्या वेगवेगळ्या नाल्यांमधून गाळ काढण्यासह बंदिस्त मार्गांच्या स्वच्छतेची कामे हाती घेतली आहेत. या कामांना वेग देण्यासह विविध ठिकाणी पावसाळी पाण्याचा उपसा करण्यासाठी पंप लावणे, आवश्यक तेथे वृक्ष छाटणी करणे ही कामे मे अखेरीस पूर्ण होतील, अशा पद्धतीचे नियोजन केले जात आहे.
मध्य रेल्वे मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मुलुंड स्थानकादरम्यान पालिका आणि रेल्वे प्रशासन यांच्या संयुक्त प्रयत्नातून रुळाखालील नाल्यांच्या प्रवाहामधून गाळ काढणे, लोहमार्गाची स्वच्छता करणे आदी कामे केली जात आहेत. या कामांची पाहणी रविवारी (ता. २२) पालिकेचे अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू आणि रेल्वेचे वरिष्ठ विभागीय अभियंता (समन्वय) सुरेश पाखारे यांनी रविवारी सकाळी रेल्वेच्या विशेष बोगीतून केली. रेल्वे रुळाखालील बंदिस्त मार्ग आणि रेल्वे रुळालगत स्वच्छता समाधानकारक झाल्याचा दावा या पथकाने केला आहे. या पाहणीवेळी पालिकेच्या वतीने उपायुक्त उल्हास महाले, प्रमुख अभियंता अशोक मिस्त्री, पर्जन्य जलवाहिन्या विभागाचे उपप्रमुख अभियंता प्रशांत तायशेटे, उपप्रमुख अभियंता विभास आचरेकर, रेल्वेचे अतिरिक्त विभागीय व्यवस्थापक सुमंत देवलकर, वरिष्ठ विभागीय अभियंता अर्पण कुमार आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.
गाळ काढण्याचे उद्दिष्ट
महापालिका प्रशासनाला आपल्या हद्दीतील नालेसफाईची कामे ३१ मे पूर्वी पूर्ण करायची आहेत. यंदा मोठे व लहान नाले मिळून एकूण २ लाख ५१ हजार ६१० मेट्रिक टन गाळ काढण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. यामध्ये शहर विभागात ३० हजार १४२ मेट्रिक टन, पूर्व उपनगरांमध्ये ७३ हजार ४४३ मेट्रिक टन, तर पश्चिम उपनगरांमध्ये १ लाख ४८ हजार २५ मेट्रिक टन गाळ काढण्यात येणार आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06376 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..