
सहा महिने समुद्रकिनारा स्वच्छ करा!
मुंबई, ता. २३ : १२ वर्षांपूर्वींचे दोन स्वतंत्र एफआयआर रद्दबातल करण्यासाठी याचिका दाखल करणाऱ्या आठ जणांना मुंबई उच्च न्यायालयात वर्सोवाचा समुद्रकिनारा स्वच्छ करण्याची अनोखी शिक्षा सुनावली. सामाजिक कार्यकर्ते अफरोज शहा यांच्या वर्सोवा सागरीकिनारा स्वच्छता अभियानात दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या रविवारी पुढील सहा महिने सहभागी व्हावे, असे आदेश खंडपीठाने दिले.
एप्रिल २०१० मध्ये तरुण मुलांच्या दोन गटांनी फौजदारी तक्रारी दाखल केल्या होत्या. यापैकी एका तक्रारीत एका मुलीला शीतपेयात गुंगीचे औषध टाकून तिचे आक्षेपार्ह फोटो काढले, तिच्याकडून लाखो रुपये आणि सोन्याची चेन घेतली, तसेच या मुलांनी तिला ब्लॅकमेल केल्याचा आरोप करण्यात आला; तर दुसऱ्या तक्रारीत मुलीच्या निकटवर्तीयांनी एका मुलाकडून पैसे उकळल्याचा आरोप चारकोप पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत केला आहे. पहिल्या तक्रारीत अंबोली पोलिसांनी न्यायालयात आरोपपत्रही दाखल केले होते; मात्र यादरम्यान दोन्ही संबंधित पक्षकारांनी एकमेकांशी समेट घडवून आणला. त्यामुळे या दोन्ही तक्रारी रद्दबातल कराव्यात, अशी मागणी मुंबई उच्च न्यायालयात याचिकेद्वारे करण्यात आली. यामध्ये तक्रारदार मुलीचे आणि मुलाचे प्रतिज्ञापत्रदेखील दाखल करण्यात आले आहे. न्या. प्रसन्न वराळे आणि न्या. एस. एम. मोडक यांच्या खंडपीठापुढे याचिकेवर नुकतीच सुनावणी झाली.
---
न्यायालय काय म्हणाले?
दोन्ही पक्षकारांनी आपापसात समेट केला आहे. या तक्रारीत दोन्ही पक्षकारांनी स्वतःकडील पैसे एकमेकांना दिले होते; मात्र आता सहमतीने तडजोड झाली आहे. त्यामुळे आता या फौजदारी तक्रारी कायम ठेवण्यात तथ्य नाही. सर्व आरोपींना आता न्यायालयात हजेरी लावण्याची आवश्यकता नाही, असे म्हणत खंडपीठाने दोन्ही एफआयआर रद्दबातल केले. तसेच न्यायालयाने दोन्ही तक्रारीतील आठ आरोपींना वर्सोवा समुद्रकिनारा स्वच्छ करण्याची शिक्षा सुनावली.
Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06397 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..