
एकाच वेळी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची याचिका
मुंबई, ता. २८ : विविध विद्यापीठांच्या परीक्षांमध्ये एकसामायिकता असावी आणि सर्व परीक्षा एकाच वेळेस घ्याव्यात, या मागणीसाठी काही विद्यार्थ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सोमवारी (ता. ३०) त्यावर सुनावणी होणार आहे.
विद्यार्थ्यांना आपल्या करिअरसाठी विविध प्रकारच्या परीक्षांना बसायचे असते. अभ्यास करायचा असतो. मात्र, राज्यातील विविध विद्यापीठांच्या परीक्षा आॅनलाईन आणि आॅफलाईन पद्धतीने होत असतात. त्यांच्या वेळा आणि पद्धतीही भिन्न असतात. अन्य राज्यांत असलेल्या विद्यापीठ परीक्षांच्या वेळांबाबतही असाच प्रकार असतो. त्यामुळे परीक्षांना हजेरी लावणे अनेकदा विद्यार्थ्यांना शक्य होत नाही आणि संधी गमवावी लागते. हे गृहित धरून सर्व विद्यापीठांनी आपल्या परीक्षा एकाच वेळी घ्याव्यात, त्यामधील अभ्यासक्रमात एकसामायिकता असावी, अशी मागणी याचिकादार विद्यार्थ्यांनी केली आहे.
याचिकादार विद्यार्थी विविध विद्यापीठांचे विद्यार्थी आहेत. जुलै-आॅगस्टचा कालावधी सर्वसाधारणपणे नवीन अभ्यासक्रम प्रवेशाचा समजला जातो. मात्र, नागपूर, पुणे इत्यादी ठिकाणच्या परीक्षा जुलैपर्यंत सुरू असतात. त्यामुळे तेथे प्रवेश घेणे कठीण असते, असे याचिकेत म्हटले आहे. तसेच दोन परीक्षांमध्ये देण्यात आलेल्या अवधीबाबतही याचिकेत प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. एकूण दहा विद्यार्थ्यांनी याचिका केली आहे. याचिकेवर तातडीने सोमवारी सुनावणी होणार आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06496 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..