
शाळेची घंटा प्रत्यक्षात १५ जूनपासून वाजणार
मुंबई, ता. ९ : राज्यात नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात १३ जूनपासून होणार आहे; परंतु कोरोना आणि त्या पार्श्वभूमीवर पहिल्या दोन दिवसांत शाळा आणि वर्गखोल्यांची स्वच्छता केली जाणार असल्याने खऱ्या अर्थाने शाळेची घंटा दोन दिवसांनी वाजणार आहे.
विद्यार्थी १५ जूनपासून प्रत्यक्षात शाळेत येतील. त्याबाबतच्या नव्या मार्गदर्शक सूचना शालेय शिक्षण आयुक्त कार्यालयाने आज जारी केल्या आहेत.
विदर्भात शैक्षणिक वर्ष २३ जून रोजी सुरू होईल. तेथील शाळांमध्ये २७ जूनपासून विद्यार्थी प्रत्यक्षात शाळेत येतील. दोन दिवसांपूर्वी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा सुरू करण्याबाबत आढावा घेतला होता. त्यानुसार १३ जून रोजी शैक्षणिक वर्षाची सुरुवात करून प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना १५ जूनपासून शाळेत बोलावण्यासंदर्भात चर्चा झाली होती. त्यानुसार आज नव्या सूचना शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी जारी केल्या आहेत.
नियमांचे काटेकोर पालन करा!
१३ ते १४ जून २०२२ रोजी शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहून शाळेच्या स्वच्छतेबाबत खबरदारी घ्यावी. शाळेचे सौंदर्यीकरण, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कोविड प्रादुर्भाव आणि आरोग्याच्या अनुषंगाने उद्बोधन आदींचे नियोजन करावे, अशा सूचनाही करण्यात आल्या आहेत. कोरोना निर्देश आणि सूचनांचे काटेकोरपणे पालनही करावे लागणार आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06798 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..