
अनिल देशमुख, नवाब मलिक मतदानापासुन वंचित
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे आमदार अनिल देशमुख आणि नवाब मलिक हे मतदानापासून अखेर वंचित राहिले. मलिक यांच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला.
निवडणुकीत पोलिस बंदोबस्तात सहभागी होऊन मतदान करता यावे, यासाठी परवानगी देण्याची मागणी मलिक यांनी केली होती. आम्हाला जामीन नको, केवळ मतदान करायला परवानगी हवी, असा युक्तिवाद ॲड. अमित देसाई यांनी केला होता. यावर न्या. पी. डी. नाईक यांच्यापुढे सुनावणी झाली. मात्र तांत्रिक कारणामुळे हा अर्ज नामंजूर करण्यात आला. यामध्ये मतदान करण्यासाठी जामिनावर सोडण्याच्या मागणीचा अर्ज संबंधित योग्य न्यायालयात करावा, अशी मुभा देऊन न्यायालयाने याचिका नामंजूर केली; तर देशमुख यांच्या याचिकेवर सुनावणी होऊ शकली नाही. मलिक यांच्या याचिकेत दुरुस्ती करून पुन्हा अन्य न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. मात्र त्यावर तातडीने सुनावणी घेण्यास न्या. भारती डांग्रे यांनी नकार दिला. यामुळे मलिक यांना मतदान प्रक्रियेत सहभागी होता आले नाही.
ईडीने या दोन्ही आमदारांच्या अर्जांना विरोध केला होता. आरोपी असल्यामुळे त्यांना निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार नाही, असा युक्तिवाद ईडीने केला होता. विशेष न्यायालयाने गुरुवारी मंत्री मलिक आणि माजी गृहमंत्री देशमुख यांचा अर्ज नामंजूर केला होता. दोघांनी याविरोधात त्यांनी उच्च न्यायालयात याचिका केली होती.
Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06818 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..