
राज्यातील पुरस्कार प्राप्त शिक्षकांना वेतनवाढ!
मुंबई, ता. २ : राज्यातील जिल्हा परिषद शाळेतील पुरस्कारप्राप्त शिक्षकांना जिल्हा परिषदेच्या उपलब्ध निधीतून वेतनवाढीचा लाभ दिला जाणार आहे. त्यासाठी ग्रामविकास विभागाकडे कोणतीही तरतूद नाही, असे स्पष्ट करून जिल्हा परिषदेने यासाठीची कार्यवाही करावी, असे आदेश ग्रामविकास विभागाने दिले आहेत.
राज्यात जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांसाठीची जिल्हा शिक्षक पुरस्कार योजना जिल्हा परिषद स्तरावरून राबविली जात होती. ही योजना राबविण्यासाठी काळजीपूर्वक शिफारशी न करता काही शिक्षकांविरुद्ध गुन्हे दाखल असतानाही त्यांची पुरस्कारासाठी निवड केली जात होती. त्याच पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद शिक्षकांना सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशीत केलेल्या तरतुदीमुळे सरकारने आगाऊ वेतनवाढ देण्याची योजनाही बंद केली होती. त्या विरोधात काही शिक्षक संघटनांनी न्यायालयात धाव घेतली होती. या पार्श्वभूमीवर ग्रामविकास विभागाने आपली भूमिका स्पष्ट केली असून, पुरस्कार प्राप्त शिक्षकांना यापूर्वीही जिल्हा परिषदेच्या निधीतूनच वेतनवाढीचा लाभ दिला जात होता, त्यानंतरही तो दिला जावा, असे स्पष्ट केले आहे.
पुरस्कारप्राप्त शिक्षकांना एक आगाऊ वेतनवाढ देण्यासाठी होणारा खर्च ग्रामविकास विभागामार्फत देण्याची तरतूद नाही. त्यामुळे जिल्हा परिषदांनी पूर्वीप्रमाणेच त्यांच्या स्वनिधीतून खर्च करावा, असे आदेश विभागाने जारी केले आहेत. त्यामुळे ४ सप्टेंबर २०१८ पर्यंतच्या जिल्हा पुरस्कारप्राप्त सर्व शिक्षकांना आगाऊ वेतनवाढ देण्याची कार्यवाही जिल्हा परिषदांनी त्यांच्याकडील उपलब्ध निधीतून करावी, असे आदेश जारी केले आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07276 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..