
आरोग्य व्यवस्थापन प्रणालीत सुधारणा हवी!
मुंबई, ता. ११ : राज्य सरकारी रुग्णालयातील रुग्णांची माहिती नोंदवण्यात येणारी आरोग्य व्यवस्थापन प्रणाली (एचएमआयएस) ५ जुलैपासून बंद पडली आहे. त्यामुळे रुग्णालयांना रुग्णांची माहिती लेखी स्वरूपान नोंदवावी लागत आहे. दरम्यान, या प्रणालीत अधिक सुधारणेची गरज असून ती वापरण्याची परवानगी सर्वच विभागाना हवी. जेणेकरून एखादा रुग्ण पुन्हा आल्यास त्याचा पूर्वेतिहास त्वरित मिळेल. त्यामुळे या प्रणाली सुधारित स्वरूपात उपलब्ध व्हावी, अशी मागणी सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांनी केली आहे.
आरोग्य व्यवस्थापन प्रणालीत रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होते; मात्र ही सुविधा केवळ ओपीडीपर्यंतच मर्यादित असल्याने इतर विभागांना अद्याप लेखी माहिती नोंदवावी लागत आहे. त्यामुळे रुग्णालयात येणारा कोणताही रुग्ण, कोणत्याही विभागात गेल्यास त्याची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होण्यासाठी या प्रणालीची सुधारित आवृत्ती मिळावी, असे वरिष्ठ डॉक्टरांचे म्हणणे आहे. राज्यातील केवळ १६ सरकारी रुग्णालयात ही प्रणाली वापरली जाते, इतर ठिकाणी अद्याप लेखी कामांवर अवलंबून राहावे लागत आहे.
---
चार कोटींचा खर्च
राज्यात लवकरच ही प्रणाली सुधारित स्वरूपात उपलब्ध होणार आहे. याबाबतची राज्य सरकारकडे थकबाकी शिल्लक आहे. तसेच सदर प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. या प्रणालीसाठी १६ सरकारी रुग्णालयाचे महिन्याला जवळपास ४ कोटी खर्च होत आहेत; तरीही या प्रणालीचा फायदा लक्षात घेता ती सुधारित स्वरूपात यावी, असे सेंट जॉर्ज रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. आकाश खोब्रागडे यांनी साांगितले.
Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07457 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..