
धर्माच्या झुंडीमुळे विषमतेची दरी वाढतेय!
मुंबई, ता. २५ : देशाच्या कानाकोपऱ्यात धर्माच्या नावाखाली निर्माण झालेल्या झुंडीपासून मानवतेलाच धोका निर्माण झाला आहे. धर्माच्या नावावर अधर्म जोर धरत आहे. त्यामुळे सामाजिक दुफळी निर्माण होऊन माणसे एकमेकांपासून दुरावत चालली असल्याने आपल्या देशात खूप मोठ्या प्रमाणावर विषमतेची दरी वाढत आहे, असे मत साहित्यिक शरद गोरे यांनी व्यक्त केले.
अखिल भारतीय मराठी साहित्य मुंबई प्रदेशने डोंबिवलीत आयोजित केलेल्या एकदिवसीय दुसऱ्या पी. सावळाराम राज्यस्तरीय साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते उद्घाटक म्हणून बोलत होते.
गोरे म्हणाले, साहित्याचा केंद्रबिंदू हा माणूस असला पाहिजे. जाती-धर्माच्या पलीकडे वैश्विक तत्त्वज्ञानच जगाला पुन्हा समता व शांतता देऊ शकेल. त्यामुळे अशा परिस्थितीत साहित्यिकांनी आपल्या साहित्यकृतीतून समाज, माणूस हा कायम एकसंध ठेवण्यासाठी लिखाण करणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.
पी. सावळाराम साहित्य संमेलनाध्यक्ष राजश्री बोहरा, स्वागताध्यक्ष अनिता गुजर, नगरसेवक बाबाजी पाटील, ज्येष्ठ पत्रकार आत्मलिंग शेटे, फुलचंद नागटिळक, अविनाश ठाकूर, नवनाथ ठाकूर, मुग्धा कुंटे, राधिका बापट, डॉ. मीना बद्रापूरकर आदी संमेलनास उपस्थित होते.
८८ साहित्यिकांचा सहभाग
एकदिवसीय साहित्य संमेलनाची सुरुवात ग्रंथपूजनाने झाली. कविसंमेलनासोबत काही पुस्तकांचे प्रकाशनही करण्यात आले. विविध क्षेत्रांतील मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. राज्यातील ८८ साहित्यिकांनी साहित्य संमेलनात सहभाग नोंदवला. मोठ्या संख्येने रसिकांनी संमेलनास हजेरी लावली होती.
Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07737 Txt Mumbai Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..