बौद्ध धम्म पदयात्रेची सांगता

बौद्ध धम्म पदयात्रेची सांगता

मुंबई, ता. १५ : तथागत गौतम बुद्ध यांचा अस्थिधातू कलश घेऊन परभणी ते चैत्यभूमी या बौद्ध धम्म पदयात्रेचा आज (ता. १५) चैत्यभूमीवर लाखोंच्या जनसमुदायाच्या उपस्थितीत समारोप झाला. या यात्रेत आंतरराष्ट्रीय बौद्ध भिक्खू संघ, थायलंड येथील ११० भिक्खूंचा सहभाग होता. या वेळी बोलताना बुद्ध विचार जागृत करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन थायलंड येथील भदंत ब्रह्मवरजीराकॉर्न यांनी केले. या यात्रेला मिळालेला प्रतिसाद ऐतिहासिक असून आपण कायम, बुद्ध आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांसाठी प्रयत्नशील असणार असल्याचे या यात्रेचे आयोजक सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांनी म्हटले.

१७ जानेवारी रोजी परभणी ते चैत्यभूमी दादर अशी भारतातील पहिली बौद्ध धम्म पदयात्रा निघाली. यात तथागत गौतम बुद्ध यांचे अस्थिकलश घेऊन थायलंड येथील आंतरराष्ट्रीय भिक्खू संघाचे ११० भिक्खू सहभागी झाले होते. तब्बल ५७० किलोमीटरचा प्रवास करून ही पदयात्रा दादर येथील चैत्यभूमीवर पोहचली. धम्म पदयात्रेच्या समारोपाच्या कार्यक्रमाला थायलंड येथील भदंत ब्रह्मवरजीराकॉर्न, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, राज्याच्या माजी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, अखिल भारतीय काँग्रेस अनुसूचित विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश लिलोटिया, रिपब्लिकन सेनेचे सरसेनापती आनंदराव आंबेडकर, भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर, आयोजक तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे, सिनेअभिनेते तथा धम्मदूत गगन मलिक यांच्यासह लाखोंच्या संख्येने बौद्ध अनुयायी उपस्थित होते.

माजी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या की, जमलेला हा जनसमुदाय तथागत गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना नतमस्तक होण्यासाठी इथे जमला आहे. तसेच, ही यात्रा अतिशय अभूतपूर्व होती. ५७० किलोमीटर पायी चालणे सोपे नाही. हे बुद्धाचे विचारच हे घडवून आणू शकतात, असे म्हटले. आनंदराज आंबेडकर यांनीही ही यात्रा ऐतिहासिक ठरली असून शांती आणि समतेचा मार्ग या यात्रेने सर्वांना दिला आहे. आज भारतात गौतम बुद्धांच्या अनेक पौराणिक वास्तू आहेत. त्या शासकीय पाशात अडकल्या आहेत. त्या मोकळ्या करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
----
भारतात निघालेल्या या बौद्ध धम्म पदयात्रेला मिळालेला प्रतिसाद पाहून आम्ही धन्य झालो आहोत. परभणीपासून चैत्यभूमीपर्यंत येताना रस्त्यात ठिकठिकाणी लाखो लोक आमचे स्वागत करत होते. हे अभूतपूर्व असून सर्वांनी शांतीचा मार्ग अवलंबला पाहिजे, त्रिशरण पंचाशीलाचे पालन करून विपश्यना करणे आवश्यक आहे. बुद्धाचे विचार जगाला दिशा देणारे आहेत, त्यासाठी सर्वांनी बुद्धाचे विचार जागृत करण्यासाठी प्रयत्न करावेत.
- ब्रह्मवरजीराकॉर्न, भदंत, थायलंड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com