
जातीवादावर ओपन हाऊस बैठक घ्या
मुंबई, ता. १८ : आयआयटी मुंबईतील विविध मागास घटकांच्या विद्यार्थ्यांना भेदभावाची वागणूक मिळते. त्यामुळेच मागील काळात विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली होती. दर्शन सोळंकी याच्या आत्महत्येनंतर याविषयी अनेक प्रश्न उपस्थित करणाऱ्या विद्यार्थ्यांची आयआयटी प्रशासनाने अडवणूक करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे काय म्हणणे आहे, त्यांना जातिवाद आणि इतर भेदभावाच्या वागणुकीच्या त्रासाला सामोरे जावे लागते, यासाठी प्रशासनाने खुली चर्चा करावी, अशी मागणी विद्यार्थी संघटनेने केली.
आयआयटी मुंबईमध्ये शिक्षण घेत असलेल्या मागास आणि इतर राखीव घटकातील विद्यार्थ्यांसोबत समान न्यायाची भूमिका असावी; परंतु अनेक वेळा विद्यार्थ्यांना भेदभावाच्या वागणुकीला सामोरे जावे लागते. आयआयटी प्रशासनाच्या संचालकांनी त्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे, यासाठी विद्यार्थी संघटनांच्या प्रतिनिधीने आयआयटी संचालकांना भेट देऊन निवेदन देण्याचा प्रयत्न केला; मात्र प्रशासनाकडून त्यांची अडवणूक करण्यात आली. तसेच सुरक्षारक्षकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची कोंडी केल्याचा विद्यार्थी संघटनेने म्हटले आहे. ज्या विद्यार्थ्यांनी मोबाईलवर व्हिडीओ चित्रीकरण करण्याचा प्रयत्न केला, त्यांनाही येथील सुरक्षा रक्षकाकडून अडवण्यात आल्याचे विद्यार्थी संघटनांचे म्हणणे आहे. विद्यार्थ्यांना या परिसरात सुरक्षा रक्षकांकडून उर्मटपणे वागणूक देण्यात आली. तसेच ही जागा केंद्र सरकार आणि आयआयटी प्रशासनाचे आहे, तेथे चित्रीकरण करता येणार नाहीत, अशी उत्तरे विद्यार्थ्यांना देण्यात आली.