
यिनच्या अधिवेशनात विचारमंथन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : यिनच्या शॅडो कॅबिनेटच्या अधिवेशनाचा गुरुवारी दुसरा दिवस होता. सकाळी १० वाजल्यापासून अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात झाली. प्रत्येक जिल्ह्यात यिन क्लबची स्थापना करण्याच्या सूचना या वेळेस देण्यात आल्या. १५० ते २०० मुलांची आठवड्यातून एकदा बैठक घेण्यात यावी. त्यातून ‘समाजाचे कल्याण, आपले कल्याण’ ही चळवळ समाजापर्यंत पोहोचवायची आहे, असे आवाहन यिन महाराष्ट्राचे व्यवस्थापक श्मामसुंदर माडेवार यांनी केले. अधिवेशनात यिनच्या मंत्र्यांनी विविध विषयांवर विचारमंथन केले.
मंत्रिमंडळाच्या कामकाजाला दहाव्या ठरावापासून सुरुवात झाली. राजकारणात शिक्षण आवश्यक आहे. आमदार, खासदाराला शिक्षणाची अट असावी, हा ठराव मांडण्यात आला. या ठरावावर विरोधकांनी जास्त टीका न करता काही सुधारणा सांगितल्या. शिवाय स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला चांगले शिक्षण उपलब्ध झाले पाहिजे, असा सल्ला विरोधकांनी दिला. केंद्रीय समितीच्या सभापती दिव्या भोसले आणि कार्याध्यक्ष अनिकेत बनसोडे यांची प्रमुख उपस्थिती दर्शवली.
...
यिनची चळवळ भारतभर पोहोचवायचे उद्दिष्ट!
आमच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने जम्मू-कश्मीरचा दौरा केला होता. आपल्याकडे आपले मत मांडणे सोपे आहे; पण तिकडे मत मांडणे, व्यवसाय करणे हे फार कठीण आहे. जम्मू-कश्मीरच्या अनेक बड्या नेत्यांना आम्ही भेटलो. तिथे चांगला अनुभव आणि माहिती आम्हाला मिळाली. येत्या काळात यिनची चळवळ भारतभर पोहोचवण्याचे आपले उद्दिष्ट आहे. सर्वच पातळीवर काम केले गेले पाहिजे. सरकारच्या निर्णय प्रक्रियेत आपल्याला सहभागी होता आले पाहिजे, असे यिनच्या केंद्रीय समितीच्या सभापती दिव्या भोसले म्हणाल्या.
...
यिनकडून ओळख घडवण्याची संधी!
भविष्यात महाराष्ट्राच्या खऱ्या मुख्यमंत्रिपदीही महिला दिसेल, अशी आम्हा सर्वांना आशा आहे. यिनकडून ओळख घडवण्याची संधी मिळते. एखादे काम करताना महत्त्वपूर्ण भूमिका बजावता येते. हीच संधी आता सर्वांना यिनच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे, असे यिनचे केंद्रीय समिती कार्याध्यक्ष अनिकेत बनसोडे म्हणाले.
...
यिनचे भविष्य काय?
यिनच्या व्यासपीठाचा चांगला वैयक्तिक आणि जाणीवपूर्वक वापर करून त्याचा फायदा समाजाला कसा होईल, याचा विचार करायला हवा, असे मत आरोग्य समिती कार्याध्यक्ष योगिराज खांडे यांनी मांडले.
...
वृक्षारोपणाने पर्यावरणावर होणारा वातावरण बदलाचा परिमाण नक्कीच टाळता येईल. त्यामुळे जास्तीत जास्त वृक्षारोपणावर भर दिला गेला पाहिजे. यासाठी भविष्यात विरोधकांनीही या कार्याला पाठिंबा दिला पाहिजे.
- आचल डवले, मुख्यमंत्री, यिन शॅडो कॅबिनेट मंत्रिमंडळ
...
वृक्षारोपण किंवा पर्यावरणाच्या मुद्द्यांवर आपण पर्यायांवर विचार केला आहे. मालेगावात आम्ही बरेचसे उपक्रम राबवले आहेत, ज्यातून झाडे लावली जातात. वाढदिवस, शिबिरे भरवताना त्यातही वृक्षारोपणाच्या मोहिमेला भर दिला पाहिजे.
- वेदांत बच्छाव, महसूल मंत्री, यिन शॅडो कॅबिनेट मंत्रिमंडळ