
मुंबईत रुद्राक्ष फुलले : रुद्राक्षाच्या झाडांना फळ ;
रुद्राक्षाच्या झाडांना पालिकेच्या कष्टाची फळे!
उद्यान विभागाच्या प्रयत्नांना यश
रुद्राक्षाचे झाड आणि त्याच्या फळांना हिंदू धर्मामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. पालिकेतर्फे वरळीतील आद्य शंकराचार्य उद्यानात लावलेली दुर्मिळ रुद्राक्षाची झाडे सध्या चांगलीच बहरली असून त्यांना फळेही आली आहेत. पालिकेच्या उद्यान विभागाने मुंबईत अन्यत्र ठिकाणीही रुद्राक्षाची लागवड करण्याचा निर्णय घेतला आहे.
वरळी जी/दक्षिण प्रभाग परिसरात असलेल्या आद्य शंकराचार्य उद्यानात ५ जुलै २०१७ रोजी रुद्राक्ष वृक्षांची लागवड करण्यात आली. दोन्ही झाडांची चांगली मशागत करण्यात आली. उद्यान कर्मचाऱ्यांच्या कष्टाचे चीज झाले आणि आता वृक्षाला फळे आली आहेत. रुद्राक्ष पवित्र वृक्ष मानला जातो. रुद्राक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बियांचे हिंदू धर्मात पारंपरिक धार्मिक महत्त्व आहे.
वरळीमधील उद्यानात सध्याचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते रुद्राक्ष वृक्षाची लागवड करण्यात आली होती.
सध्या संपूर्ण मुंबईत केवळ आद्य शंकराचार्य उद्यानातील झाडांनाच फळे आली आहेत. त्याशिवाय चेंबूर आणि पवई परिसरात मिळून एकूण १५ रुद्राक्षांच्या झाडांची लागवड करण्यात आली आहे. रुद्राक्षांची झाडे कोकण परिसरात सर्वाधिक आढळतात. त्याच प्रकारचे दमट वातावरण मुंबईतही आहे. मात्र, मुंबईतील वाढत्या प्रदूषणामुळे रुद्राक्षांची झाडे वाढतील की नाही, याबाबत साशंकता होती. आता मुंबईतही रुद्राक्षांची झाडे वाढू लागल्याने अन्यत्रदेखील त्यांची लागवड करण्यात येणार आहे, अशी माहिती उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेसी यांनी दिली.