
ब्लड ऑन कॉल सरकारी योजनेतील कर्मचारी सेवेत समायोजना
‘ब्लड ऑन कॉल’मधील कर्मचाऱ्यांची उपेक्षा
समायोजनापासून दूर; सामूहिक आत्महत्येचा इशारा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : ‘ब्लड ऑन कॉल’ ही सरकारी योजना असून ‘मागेल त्याला रक्त’ असे या योजनेचे नियोजन आहे. योजनेतील गरज पाहता यात त्वरित कंत्राटी भरती करण्यात आली. सोशल वर्कर, तंत्रज्ञ आणि रक्त संक्रमण अधिकारी अशा तीन पदांवर एकूण १०९ जणांची भरती करण्यात आली. २०१४ मध्ये ही योजना सुरू करुन २०२२ या वर्षात हा प्रकल्प बंद केला. आता या याजनेत १०९ कर्मचारी बेरोजगार झाले आहेत. या कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्याचे निवेदन मुख्यमंत्री, कॅबिनेट मंत्री अशा अनेकांना देऊनही दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप कर्मचारी करत आहेत. तसेच त्यांनी सामूहिक आत्महत्येचा इशारा दिला आहे.
हनुमान रुले या कर्मचाऱ्याने सांगितले की, सुरुवातील आम्हाला सरकारी योजनेत काम लागल्याने आम्ही सर्व खुश होतो. मात्र ३१ मार्च २०२२ रोजी हा प्रकल्प बंद केला, असे सांगत आम्हाला काम थांबवण्यास सांगितले; मात्र रुग्णालयांचे अधिष्ठाता, तसेच जिल्हा चिकित्सकांनी सतत पत्र पाठवून आम्हा कर्मचाऱ्यांची गरज असल्याचे नमूद केले आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. हनुमान रुले हे सोशल वर्कर पदावर नियुक्त असून ते रक्तदानाबाबत भीती कमी करणे, समुपदेशन करणे, रक्तदान शिबिरासाठी प्रवृत्त करणे, संस्थांना राजकीय पक्षांना भेटी देणे देऊन रक्त संकलन अधिकाधिक करण्याची जबाबदारी पार पाडत होते. मात्र त्यांच्यासह राज्यातील १०९ जण कोणतीही अधिकची मागणी न करता सोपवलेली काम पार पाडत होते.
आत्महत्या करण्याचा इशारा
२०१४ या वर्षांत या कर्मचाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या. या कर्मचाऱ्यांना ११ महिन्यांचे काम देऊन एक दिवसांचा खंड देऊन पुन्हा ११ महिन्यांचे काम दिले जात होते. आता यातील कर्मचाऱ्याचे वय ४३ हून अधिक उलटून गेल्याने बाहेरील कोणत्याही कामसाठी त्यांना अपात्र ठरवले जाते. त्यामुळे कुटुंबाचा उदारनिर्वाह करू शकत नाहीत. अखेर कंटाळलेल्या या कर्मचाऱ्यांनी सेवेत समाविष्ट करून घ्या; अन्यथा सामूहिक आत्महत्या करण्याचा इशारा दिला आहे.
ब्लड ऑन कॉल योजना
राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत रक्त संक्रमण परिषदेच्या माध्यमातून राज्यभरातील शासकीय रक्त केंद्रांमध्ये ऑक्टोबर सन २०१३ मध्ये ब्लड ऑन कॉल जीवन ही रुग्णहिताची अभिनव योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक शासकीय रक्त केंद्रांमध्ये अत्यल्प वेतनावर प्रत्येकी एक एक रक्त संक्रमण अधिकारी, वैद्यकीय समाजसेवक, तंत्रज्ञ यांची नियुक्ती करण्यात आलेली होती. या कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यामुळे सर्व शासकीय रक्त केंद्राला मदत झाली. गरजू रुग्णांनाही वेळेवर रक्त उपलब्ध होत होते; परंतु या योजनेवर पैसा खर्च होत आहे व प्रतिसाद कमी मिळत आहे, असा ठपका ठेऊन तत्कालीन शासनाने ही रुग्ण हिताची ब्लड ऑन कॉल अभिनव योजना मार्च रोजी कायमस्वरूपी बंद केली.