
Mumbai : सिग्नल यंत्रणा हायटेक! पालिका नव्याने उभारणार वाहतूक नियंत्रण प्रणाली
Mumbai - मुंबईच्या शहर आणि पश्चिम व पूर्व उपनगरे विभागातील विविध नाक्यांवरील पारंपरिक वाहतूक नियंत्रण प्रणाली नव्याने उभारण्यात येणार आहे. त्यासाठी पालिकेच्या रस्ते व वाहतूक विभागाच्या प्रमुख अभियंता विभागाने ई-निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. त्यावर साधारण १० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.
मुंबईतील वाहतूक नियंत्रण प्रणाली उभारण्याचे काम महापलिकेतर्फे केले जाते. पोलिसांच्या वाहतूक विभाग कार्यालयाकडून विविध जंक्शनवर नवीन वाहतूक नियंत्रण प्रणाली बसविण्यासाठी प्राधान्य यादी पालिकेला देण्यात आली आहे. त्यानुसार त्यासाठीचे काम पालिकेने सुरू केले आहे. काम पूर्ण झाल्यानंतर मुंबईतील सिग्नल यंत्रणा हायटेक होण्यास मदत होणार आहे.
शहर आणि उपनगरांतील विविध वाहतूक नाक्यांवर पारंपरिक वाहतूक नियंत्रण प्रणाली बसवण्यात येणार आहे. त्यासाठी पालिकेने आवश्यक वस्तूंचा पुरवठा, उभारणी आणि कार्यान्वित करण्यासाठी ई-निविदा मागवल्या आहेत. काम झाल्यानंतर १२ महिन्यांचा दोषदायित्व कालावधी कंत्राटदारावर बंधनकारक असणार आहे.
ई-निविदा प्रक्रियेस निविदाकारांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. शहर आणि पश्चिम व पूर्व उपनगरांत तिन्ही विभागांतील प्रथम लघुत्तम निविदाकारांचे प्राप्त दर कार्यालयीन अंदाजापेक्षा जास्त असल्यामुळे त्यांना त्यांच्या देकाराच्या किमतीमध्ये वाटाघाटी करण्यास सांगण्यात आले.
त्यास प्रतिसाद म्हणून तिन्ही निविदाकारांनी त्यांचे देकार कमी करून दिले. सध्या त्याबाबतचा प्रस्ताव आयुक्तांच्या दफ्तरी असून त्यांची मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.
दहा कोटींचा खर्च
एकूण खर्च : ९,४७,२४,०२४ रु.
शहर : २,२८,२४,३६९ रु.
पश्चिम उपनगरे : ३,२२,९५,४६८ रु.
पूर्व उपनगरे : ३,९६,०४,१८७ रु.