
पाम उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसाह्य
मुंबई, ता. १८ ः गोदरेज अॅग्रोव्हेटचा पामतेल व्यवसाय, तसेच स्टेट बँक यांनी संयुक्तपणे देशातील पाम उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसाह्य करण्याचा निर्णय घेतला आहे. पाम लागवड केल्यानंतर पहिल्या पाच वर्षांत शेतकऱ्यांना या अर्थसाह्याचा मोठा फायदा होईल.
‘गोदरेज ॲग्रोव्हेट बिझनेस’चे सीईओ सौगता नियोगी यांनी आज ही माहिती दिली. या अर्थसाह्य योजनेतून उत्पादक शेतकरी आपल्या पाम वृक्षांना सिंचनासाठी कर्ज घेऊ शकतील. त्याचप्रमाणे भटक्या गुरांपासून झाडांचे संरक्षण करण्यासाठी कुंपण घालू शकतील, तसेच पाम वृक्षांच्या शेतात कूपनलिका टाकू शकतील. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन वाढावे अशी मूळ योजना आहे. त्यामुळे त्यांचा पामशेती करण्याचा आत्मविश्वासही वाढेल. पाम वृक्षांची लागवड केल्यानंतर पहिल्या काही वर्षांत शेतकऱ्यांना कोणतेही अर्थसाह्य मिळत नाही. त्यामुळे हे अर्थसाह्य त्यांना वरदानच ठरेल. नॅशनल मिशन ऑन एडीबल ऑईल या योजनेनुसार शेतकऱ्यांना साह्य करण्यासाठी ही योजना आहे, असेही नियोगी म्हणाले. एक लाख ते पन्नास कोटी रुपयांपर्यंत हे कर्ज मिळू शकेल. विशेषतः प्रथमच पाम वृक्षांची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना याचा खूपच फायदा होईल. सध्या देशात ६५ हजार हेक्टर क्षेत्रावर पाम वृक्षांची लागवड झाली आहे. २०२७ पर्यंत हे क्षेत्र एक लाख हेक्टरपर्यंत करण्याचे गोदरेज अॅग्रोव्हेटचे ध्येय आहे. कंपनीतर्फे समाधान केंद्रावर यासंदर्भात उत्पादक शेतकऱ्यांना सर्व माहिती दिली जाते. प्रत्येक केंद्र दोन हजार हेक्टर क्षेत्रावरील शेतकऱ्यांना साह्य करण्यासाठी तयार करण्यात आले आहे.