
अकरावी ऑनलाईन प्रवेशासाठी तीन हजारांहून विद्यार्थ्यांचा सराव
मुंबई, ता. २० : मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, अमरावती नागपूर या महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांत ११ वीच्या प्रवेशासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याच पार्श्वभूमीवर ऑॅनलाईन प्रवेश प्रक्रियेचा पहिल्याच दिवशी ३ हजार ४२९ जणांनी सराव केल्याची माहिती शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी यांनी दिली.
अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशासाठी पहिला भाग भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी विद्यार्थ्यांचे शनिवारपासून (ता. २०) सराव अर्ज भरले जात आहेत. पहिल्याच दिवशी ३,४२९ जणांपैकी मुंबईत सर्वाधिक दोन हजार २०४, पुणे विभागात १ हजार ६१ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन संकेतस्थळाला भेटी देऊन सराव केला. तर अमरावती ६१, नागपूर-६३ आणि नाशिक विभागातून ८५ जणांनी सराव केला. त्यात ८१७ जणांच्या सरावाचे अर्ज पूर्ण; तर २६६ जणांचे स्वयंम पडताळणी झाले. तसेच ५५१ जणांचे अर्ज पडताळणीविना अपूर्ण राहिले असून, त्यांना पुढील दोन दिवसांत पूर्ण करता येतील.
दरम्यान, संकेतस्थळ नीट चालत नसल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांकडून सुरू झाल्या आहेत. दिवसभरात अनेकदा हे संकेतस्थळ चालत नसल्याने त्यासाठी सराव अर्ज आणि त्यातील माहिती भरता आली नसल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. अकरावी प्रवेशाचे संकेतस्थळ हे सुरळीत चालावे, विद्यार्थ्यांना कोणत्याही अडचणी येऊ नयेत यासाठी आमचा प्रयत्न आहे. आज पहिलाच दिवस होता. विद्यार्थ्यांना काही अडचणी आल्या असतील तर त्यांनी आम्हाला कळवल्यास त्यात सुधारणा करून ही सर्व प्रक्रिया अधिकाधिक सुरळीत केली जाईल, असे शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी यांनी सांगितले.