
जूनच्या पहिल्या आठवड्यात दहावीचा निकाल
मुंबई, ता. २८ : राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होणार आहे. मंडळाकडून याबाबतची कार्यवाही अंतिम टप्प्यात असल्याचे सांगण्यात आले.
मंडळाने बारावीच्या परीक्षेचा निकाल वेळेपूर्वीच जाहीर केला. दहावीच्या परीक्षेचाही निकाल वेळेपूर्वीच लावण्याची तयारी सुरू केली आहे. यामुळे हा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यातच जाहीर होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. दहावीच्या परीक्षा पूर्ण झाल्यानंतर राज्यात शिक्षकांचे जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी आंदोलन सुरू होते; तर काही संघटनांनी पेपर तपासणीवरही बहिष्कार टाकला होता. यामुळे काही दिवस पेपर तपासणीला उशीर होत होता; मात्र मंडळाने इतर सर्व यंत्रणा कामाला लावून दहावीच्या परीक्षेचे पेपर तपासणीचे कामही वेळेत पूर्ण केले असून आता केवळ निकाल जाहीर करण्यासाठी गुणांकन आणि त्यासाठीची जुळवाजुळव आदी तांत्रिक कामे शिल्लक राहिली आहेत. येत्या काही दिवसांत ती पूर्ण होणार असल्याने दहावीच्या परीक्षेचा निकाला हा जूनच्या पहिल्या आठवड्यातच जाहीर केला जाणार असल्याचे सांगण्यात आले. यंदा दहावीच्या परीक्षेला राज्यभरातून १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. पाच हजार ३३ मुख्य परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा पार पडली. त्यात मुंबई विभागात या परीक्षेला तीन लाख ५४ हजार ४११ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती; तर ही परीक्षा एक हजार ४९ केंद्रावर घेण्यात आली होती.