
अदाणी पोर्टविरोधात सागरी आंदोलन छेडणार
मुरूड, ता. ३ (बातमीदार) ः दिघी पोर्टचा १४ गावांच्या संघर्ष समितीशी करार झाला होता, पण या पोर्टचा ताबा अदाणी समूहाकडे गेला. त्यानंतर कोळी समाजाने अनेकदा निवेदने देऊनही अदाणी समूहातील अधिकाऱ्यांनी कोळी समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले, असा आरोप मच्छीमारांनी केला आहे. येत्या दोन दिवसांत मागण्यांकडे लक्ष न दिल्यास अदाणी समूहाविरोधात सागरी आंदोलन छेडणार असल्याचा इशार मच्छीमार संघाचे प्रमुख समन्वयक प्रकाश सरपाटील यांनी दिला.
सध्या अदाणी पोर्टकडून खोल समुद्रात ड्रेनेज केले जात असल्यामुळे चिखल काढला जात आहे. त्यामुळे समुद्राच्या तळाशी असणारी मासळी खूप दूर निघून गेली आहे. होड्यांचे ऑर्इल समुद्रकिनारी येऊन किनारे विद्रूप होत आहेत. मागील दोन वर्षांत मच्छिमारांचे ५० कोटी रुपयांचे नुकसान या पोर्टमुळे झाले आहे. ज्या वेळी ड्रेनेज केले जाते, त्या वेळी मच्छीमारांना शासनाकडून भरपाई दिली जाते, परंतु अदाणी समूहाकडून कोळी समाजाला कोणतीही मदत मिळत नाही. या कंपनीकडून आम्हाला प्रत्येक बोटीमागे वार्षिक १० लाख रुपयांची मदत भरपाई म्हणून दिली जावी, अशी मागणी सरपाटील यांनी केली आहे.
या वेळी त्यांच्यासमवेत नाखवा मंडळाचे अध्यक्ष नारायण चव्हाण, दिघी येथील एकवीरा मच्छीमार संघाचे चेअरमन लक्ष्मण मेंदाडकर, जय भवानी मच्छीमार संघाचे उपाध्यक्ष महेंद्र गार्डी, लहान नाखवा मंडळाचे सचिव रमेश रामचंद्र बाणकोटकर, कृष्णा चव्हाण, रघुनाथ बाणकोटकर, चंद्रकांत सरपाटील, महेश्वरी सहकारी संस्थेचे चेरमन जगनाथ वाघरे, संदीप डाकी, जाया मकू, किशोर केंडू, ललित आगलावे, लक्ष्मण नागूठकर, संजय मालीम, राजेंद्र गीते, काशिनाथ गर्जा, नरेश आगरकर आदी उपस्थित होते.
---
आमचे सर्व मच्छीमार खोल समुद्रात जाऊन अदाणी कंपनीचा बोटीद्वारे येणारा माल अडवणार आहेत. कोणतीही बोट किनाऱ्याला लागू देणार नाही. जोपर्यंत आमच्या मागण्या मंजूर होणार नाहीत, तोपर्यंत हे सागरी आंदोलन सुरू राहणार आहे.
- प्रकाश सरपाटील, समन्वयक
-------
कंपनीने जहाजांना येण्यासाठी जे चॅनेल उभारले आहेत, ते काढून अतिरिक्त जागा घेऊन मोठ्या प्रमाणात भाग खोल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे जर समुद्रतळाशी असणाऱ्या विषारी वायूचा स्फोट झाला तर मोठ्या प्रमाणात मासळी मरणार आहे.
- नारायण चव्हाण, नाखवा मंडळाचे अध्यक्ष
-------
या पोर्टमुळे मासेमारी ठप्प झाली आहे. दीड महिन्यापासून मासळी मिळत नाही. कोळसा उतरवल्यामुळे आजूबाजूच्या गावांना कॅन्सरचा धोका निर्माण झाला आहे.
- लक्ष्मण मेंदाडकर, एकवीरा मच्छीमार संघ
Web Title: Todays Latest Marathi News Md122b01390 Txt Raigad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..