
मनोज आव्हाडच्या मारेकऱ्यांना फाशी द्या
मानखुर्द, ता. ३० (बातमीदार) ः औरंगाबाद येथे मागील आठवड्यात (ता. २०) चोरीच्या संशय घेऊन मनोज आव्हाड याला हात-पाय बांधून मारहाण करण्यात आली होती. त्या मारहाणीमुळे त्याचा मृत्यू झाला. त्याच्या हत्येस कारणीभूत असलेल्या आरोपींविरोधात फास्टट्रॅक कोर्टात खटला चालवण्यात यावा, त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी, तसेच मनोजच्या कुटुंबीयांना दहा लाख रुपयांची मदत तत्काळ देण्यात यावी, या मागणीचे निवेदन मातंग क्रांती महामोर्चाच्या वतीने गुरुवारी (ता. २८) सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे याना देण्यात आले.
औरंगाबादच्या शताब्दीनगर येथे चोरीच्या संशयातून मनोज आव्हाड या तरुणाला स्कार्फने हात-पाय बांधून दांडक्याने बेदम मारण्यात आले होते. या मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल करण्यात आला होता. तो गयावया करत असतानादेखील अमानवी पद्धतीने त्याला ही मारहाण करण्यात आली होती. त्याला अमानुषपणे मारहाण करणाऱ्या आरोपींविरोधात फास्टट्रॅक न्यायालयात खटला चालवण्यात येऊन त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी. मनोजच्या कुटुंबीयांना तत्काळ आर्थिक मदत म्हणून १० लाख रुपये देण्यात यावेत, तसेच त्याच्या पत्नीला सरकारी नोकरी देण्यात यावी, अशी मागणी मातंग क्रांती महामोर्चा मुंबईच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन महामोर्चाच्या वतीने सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, तसेच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेऊन देण्यात आले. या निवेदनावर मुंडे यांनी तत्काळ शेरा मारत कार्यवाहीचे आदेश दिले आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g80512 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..