
बर्फ टंचाईमुळे मच्छिमार हवालदील
भाईंदर, ता. ३० (बातमीदार) : मिरा-भाईंदरमधील वीजपुरवठा सुरळीत सुरू असला तरी अन्यत्र खंडित होत असलेल्या विजेचा फटका उत्तनमधील मच्छीमारांना बसत आहे. वीज खंडित होण्याचा परिणाम बर्फ उत्पादनावर होत आहे. कंपन्या पुरेसा बर्फ बनवू शकत नसल्यामुळे बर्फाची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. सध्या समुद्रात मुबलक मासळी उपलब्ध असतानाच पकडलेली मासळी साठवण्यासाठी वेळेवर बर्फ मिळत नसल्यामुळे मच्छीमार हवालदील झाला आहे.
समुद्रात मच्छीमारांना पकडलेली मासळी साठवण्यासाठी बर्फ आवश्यक असतो. मासेमारीला जातानाच मच्छीमार बर्फ सोबत नेत असतात, परंतु गेल्या आठ दिवसांपासून बर्फ मिळवण्यासाठी मच्छीमारांना वणवण करावी लागत आहे; मात्र तरीही तो वेळेवर मिळत नसल्याचे मच्छिमारांचे म्हणणे आहे. उत्तनमध्ये ७०० हून अधिक मासेमारी नौका आहेत. एका नौकेला किमान तीन टन बर्फ लागतो. उत्तनमध्ये मच्छीमार सोसायट्यांच्या स्वत:च्या बर्फ कंपन्या असल्या, तरी या कंपन्या लागणाऱ्या बर्फाच्या केवळ २५ टक्केच पुरवठा करू शकतात. परिणामी मच्छीमार तळोजा, कामण, वाशी आदी ठिकाणांहून बर्फ आणत असतात.
मात्र या ठिकाणी वारंवार वीज खंडित होत असल्यामुळे बर्फ उत्पादनावर परिणाम होत आहे. बर्फ तयार होण्यासाठी ४८ तास लागतात. यादरम्यान वीज गेली तर हा कालावधी वाढत जातो. अनेक ठिकाणी चार ते पाच तास वीज जात असल्यामुळे पुरेसा बर्फ बनवला जाऊ शकत नाही, असे मच्छीमारांचे म्हणणे आहे. त्यामुळे बर्फासाठी दोन ते तीन दिवस वाट पाहावी लागत आहे.
कोट
मच्छीमारांसाठी आगामी दिवस अत्यंत महत्त्वाचे असल्यामुळे त्यांना पुरेसा आणि वेळेवर बर्फ मिळणे आवश्यक आहे. ऊर्जामंत्र्यांनी वीज समस्येवर तातडीने उपाययोजना करून मच्छीमारांना पुरेसा बर्फ मिळेल, अशी व्यवस्था केली तर मच्छीमारांचे नुकसान टाळता येऊ शकेल.
शर्मिला बगाजी, नगरसेविका, उत्तन
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g80562 Txt Palghar
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..