
पोलिसांकडून कडक बंदोबस्त
ठाणे, ता. ३ ः मनसेने दिलेल्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने कडक उपाययोजना अवलंबण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मनसेचे आमदार राजू पाटील यांच्यासह १४०० पेक्षा जास्त मनसे कार्यकर्त्यांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ठाणे शहरात ३५० पोलिस अधिकारी आणि साडेसात हजार कर्मचारी तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच कुणीही कायदा मोडण्याचा प्रयत्न करू नये. तेढ निर्माण होईल, असे वक्तव्य अथवा समाजमाध्यमांवर संदेश पाठवू नये, असे आवाहन ठाण्याचे पोलिस सहआयुक्त दत्तात्रय कराळे यांनी केले आहे.
सध्याच्या राजकीय व धार्मिक पार्श्वभूमीवर कुणीही कायदा मोडू नये. सामाजिक सलोख्यात तेढ निर्माण होईल, असे वक्तव्य करू नये; अथवा समाजमाध्यमांवर संदेश, व्हिडीओ प्रसारित करू नये, असे आवाहन सहआयुक्त दत्तात्रय कराळे यांनी केले. कोणी कायद्याचे उल्लंघन केल्याचे आढळून आले, तर त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ३५० पोलिस अधिकारी, साडेसात हजार कर्मचारी, सीआरपीएफ जवान, ३०० होमगार्ड बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. कोणीही विनाकारण एके ठिकाणी जमू नये. यासाठी जमावबंदीचे १४४ कलम पोलिसांकडून लागू करण्यात आले आहे. आपापल्या परिसरात सामाजिक व जातीय सलोखा अबाधित ठेवावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81052 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..