
कोपरखैरणे विभागातील वाहतूक कोंडी फुटणार
घणसोली, ता. ५ (बातमीदार) : नवी मुंबईतील कोपरखैरणे विभाग हा दाट लोकसंख्येचा ओळखला जातो. येथील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी कोपरी नाल्यावर रेल्वे रुळालगत महापालिकेमार्फत आणखी एका पुलाची निर्मिती करण्यात येणार आहे. या पुलामुळे वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
कोपरखैरणे भागात झपाट्याने नागरी वस्ती वाढल्याने वाहनांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे कोपरखैरणेत अंतर्गत आणि मुख्य रस्त्यावर वाहतूक कोंडी नेहमीच होत असते. नवी मुंबई महापालिकेद्वारे कोपरी नाल्यावर पामबीच मार्गाला जोडण्यासाठी पुलाची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र हा रस्ता वाहनचालकांना सोयीस्कर असल्याने या मार्गावर सर्वाधिक वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. या मार्गावर वाशी आणि ठाण्याकडे ये-जा करणाऱ्या वाहनांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक कोंडी फोडण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. कोपरी नाल्यावर रेल्वे रुळालगत पूल तयार झाल्यानंतर खैरणेपासून थेट तुर्भे, एपीएमसी मार्केटपर्यंत प्रवास करता येणार आहे.
सव्वापाच कोटी रुपयांचा खर्च
नवी मुंबई महापालिकेतर्फे कोपरी नाल्यावर खैरणे गाव ते कोपरी तलाव या मार्गावर रेल्वे रुळालगत आणखी एका पुलाची निर्मिती करण्यात येणार आहे. त्यासाठी सव्वापाच कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, लवकरच या कामाची प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81277 Txt Navimumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..