
उघड्या गटारींमुळे पादचाऱ्यांना धोका
वसई, ता. ५ (बातमीदार) ः वसई विरार शहरात गटारांची दुरुस्ती करण्याच्या बहाण्याने गटारे तशीच उघडी सोडण्याचे प्रकार आढळून येत आहेत. दुरुस्ती करण्यासाठी खोदकाम केले जाते; पण खोदकाम केल्यानंतरच्या लोखंडी सळया, सिमेंट, खडी त्याच ठिकाणी अनेक दिवसांपासून पडून राहत आहेत. यामुळे रस्त्यावर चालणाऱ्या पादचाऱ्यांना धोका निर्माण झाला आहे; पण याकडे ठेकेदार, अभियंता यांचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे.
वसई, नालासोपारा, विरार व नायगाव या चार शहरात सांडपाण्याचा निचरा व्हावा, यासाठी ठिकठिकाणी गटारांची उभारणी केली आहे; मात्र अनेक भागात उघडी, नादुरुस्त गटारे आहेत. नागरिकांची तक्रार आल्यावर गटारांच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले जाते. या वेळी खोदकाम करताना लोखंडी सळया, सिमेंट, खडी निघते; परंतु हे टाकाऊ साहित्य अनेक दिवस त्याच ठिकाणी पडलेले असते. गटारातून निघणारे सांडपाणीदेखील वाहत असते. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव होतो. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, गरोदर माता रस्त्यावरून चालताना अपघात होण्याची शक्यता असते. एकीकडे महापालिका कोट्यवधी रुपयांच्या कामांना मंजुरी देऊन काम सुरू करते; पण नागरिकांच्या सुरक्षेकडे कानाडोळा करते, असा आरोप नागरिक करत आहेत.
-----
पावसाळी कामे सुरू आहेत. सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित व्हावा म्हणून शहरातील गटारांची पाहणी करून रुंदीकरण, दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. ज्या ठिकाणी टाकाऊ साहित्य पडले असेल, तिथे काम करणाऱ्या ठेकेदाराला ते हटवण्याच्या सूचना देण्यात येतील. नागरिकांच्या सुरक्षेची काळजी प्रशासनाकडून घेतली जाईल.
- राजेंद्र लाड, कार्यकारी अभियंता
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81331 Txt Palghar
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..