
राज्यपाल कोश्यारी यांचे पाठपुराव्याचे आश्वासन
जोगेश्वरी, ता. ७ (बातमीदार) ः मुंबई-कोळी बांधवांच्या उपजीविकेच्या समस्या गंभीर आहेत. या समस्यांचा अभ्यास करून त्यांचे निराकरण करण्यासाठी आपण सरकारकडे पाठपुरावा करू, असे आश्वासन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शनिवारी (ता. ७) येथे दिले.
राज्यपालांनी अंधेरी पूर्व जे. बी. नगर, मरोळ सुकी मासळी बाजार येथील मरोळ बाजार मासळी विक्रेता कोळी महिला संस्थेला भेट दिली. मरोळ बाजार मासळी विक्रेता कोळी महिला संस्थेच्या अध्यक्षा राजेश्री भानजी यांनी या मेळाव्याचे आयोजन केले होते. या वेळी राजेश्री भानजी यांनी व कोळी महिलांनी राज्यपालांना कोळी टोपी व सजवलेली होडी भेट दिली. मरोळ मासळी बाजाराला भेट देणारे भगतसिंग कोश्यारी हे पहिले राज्यपाल आहेत.
मासळी बाजार सुरक्षित राहावेत, परंतु समुद्र किनारादेखील सुरक्षित राहावा या मताचे आपण आहोत असे सांगून कोळी समाजाच्या समस्येत आपण लक्ष घालू; परंतु आपला लढा शांततापूर्ण मार्गानेच लढावा, अशी सूचना राज्यपालांनी केली. कोळी समाज हा भगवान विष्णूच्या दहा अवतारांपैकी एक असलेल्या पहिल्या मत्स्य अवताराचा वारसा सांगणारा समाज असून समाजबांधवांनी याचा सार्थ अभिमान बाळगावा, असे राज्यपालांनी सांगितले. मुंबई ही कोळ्यांची होती, परंतु आज कोळी समाज, कोळीवाडा व किनारपट्ट्या उद्ध्वस्त होत आहेत. डिझेल अनुदान नसल्यामुळे कोळ्यांची एकही बोट सुरू नाही. त्यामुळे त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे, असे राजश्री भानजी यांनी सांगितले.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81459 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..